आर्णी नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्या वाऱ्यावर
By Admin | Updated: June 22, 2015 02:08 IST2015-06-22T02:08:17+5:302015-06-22T02:08:17+5:30
आर्णी नगरपरिषद झाल्यावर नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्यांचा कारभार वाऱ्यावर आहे.

आर्णी नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्या वाऱ्यावर
आर्णी : आर्णी नगरपरिषद झाल्यावर नगरपरिषद क्षेत्रातील २६ अंगणवाड्यांचा कारभार वाऱ्यावर आहे. हा कारभार एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाकडे होता. परंतु नगरपरिषदेच्या स्थापनेनंतर देखभाल पालिकेकडे देण्यात आली. परंतु या संदर्भातील हस्तांतरणाची प्रक्रिया अद्याप झालीच नाही. त्यामुळे या अंगणवाड्यांकडे कुणाचेही लक्ष नाही. परिणामी या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या ३१३ विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
एकात्मिक बालविकास विभागाकडून अंगणवाड्यातील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. परंतु अंगणवाडी केंद्रांची देखभाल व किरकोळ खर्च हा त्यांना करता येत नसल्यामुळे विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्या आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास २३ फेब्रुवारी २०१४ पासून न्यायालयासमोर असलेल्या अंगणवाडी क्र.११, १३ व १६ यांचे छत उडून गेल्याने त्या बंदच आहे. अंगणवाडीमध्ये असलेल्या ० ते ६ वर्ष या वयोगटातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना उघड्यावरच पोषण आहार दिला जातो. कागदोपत्री या अंगणवाड्या चालू दाखविण्यात आल्या असल्या तरी त्यांचे कामकाज बंद आहे. या तीन अंगणवाड्यांमध्ये ३१३ विद्यार्थी आहे. त्यांची पूर्णपणे नुकसान होत आहे.
एकीकडे शासनाकडून कुणीही शाळाबाह्य राहू नये, यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे मात्र हस्तांतरणाअभावी अडकून पडलेल्या अंगणवाड्यांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. नगरपरिषदेला याची दुरुस्ती करता येत नाही, असे सांगितल्या जाते. चिमुकल्यांना बालपणापासूनच शिक्षण मिळावे व त्यांची पूर्व तयारी व्हावी तसेच त्यांच्या आरोग्याकडे योग्य ते लक्ष देता यावे यासाठी अंगणवाडी महत्त्वपूर्ण ठरते. आर्थिकदृष्ट्या सबळ असणाऱ्या पालकांची मुले खासगी शाळेत जातात. परंतु समाजातील गोरगरीबांची मुले या अंगणवाड्यांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे समाजातील वंचित घटकांबाबत शासनाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींना कोणत्याही संवेदना नसल्याची प्रतिक्रिया पालकवर्गांमधून व्यक्त होत आहे.
आर्णी शहरातील न्यायालयासमोर असलेल्या एक नव्हेतर तीनही अंगणवाड्यांचे छत उडून गेले आहे. परंतु त्याकडे लक्ष देण्यात येत नाही. १५ महिने उलटूनही त्याची दखलच घेण्यात आली नाही. या बाबत संबंधितांना विचारणा केली असता हस्तांतरणच झाले नसल्यामुळे आम्ही या बाबत खर्च करू शकत नाही, असे उत्तर देण्यात आले. शहरातील लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था या पैकी कुणीही या संदर्भात पुढाकार घ्यायला तयार नाही. तसेच या चांगल्या कामासाठी आपल्या खिशातून कुणी दोन पैसेही खर्च करण्यास तयार नसल्याचे दिसून येते. कुणीतरी या बाबत पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा पालकवर्गाला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सध्या नवीन जिल्हाधिकारी आले आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील प्रशासकीय कामात कमालीची गती आली आहे. त्यांनी आर्णी शहरातीलच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या कारभारावर कटाक्ष टाकावा आणि गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी पालकवर्गांमधून व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)