तस्करी नियंत्रणासाठी रेतीघाटांवर २४ तास ‘वॉच’
By Admin | Updated: May 29, 2015 00:11 IST2015-05-29T00:11:17+5:302015-05-29T00:11:17+5:30
रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे.

तस्करी नियंत्रणासाठी रेतीघाटांवर २४ तास ‘वॉच’
यवतमाळ : रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे. रेती तस्करी नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या रेती उपस्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. यानंतर भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील ८६ रेतीघाटांपैकी ४८ रेतीघाटांचा लिलाव झाला. उर्वरित ३८ रेतीघाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया पार पडली. तीन वेळा प्रक्रिया राबविल्यानंतरही कुणीही लिलाव घेतला नाही. यामुळे या घाटातील रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. विशेष म्हणजे या भागातील तस्करांनी रेतीघाट रिकामे केले आहेत. यातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सोबतच शासनाच्या तिजोरीतील महसूल पळविला आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. हे भरारी पथक २४ तास वॉच ठेवणार आहे. त्यासाठी २५ नाक्यांवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे. विशेष म्हणजे दर आठ दिवसाला खनिकर्म अधिकारी भरारी पथकांचा आढावा घेणार आहे. यातून भरारी पथकांच्या कामगिरीची माहिती प्रशासनाला तत्काळ मिळणार आहे. यापूर्वी अनेक प्रयोग रेती चोरी थांबविण्यासाठी झालेले आहे. (शहर वार्ताहर)