२० गावे तहानलेलीच

By Admin | Updated: May 19, 2014 23:56 IST2014-05-19T23:56:52+5:302014-05-19T23:56:52+5:30

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे.

20 villages thirsty | २० गावे तहानलेलीच

२० गावे तहानलेलीच

नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

अखिलेश अग्रवाल - पुसद

पाणीटंंचाईसाठी कुप्रसिद्ध असलेल्या पुसद तालुक्यातील माळपठार भागात यंदाही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बेलोरा सर्कलमधील तब्बल २० गावे १५ दिवसांपासून तहानलेली आहे. पाण्यासाठी एक ते दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत असून सायकल, बैलगाडीने पाणी आणावे लागत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे शेकडो नागरिकांंना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. पुसद तालुक्यातील माळपठार भाग गेल्या कित्येक वर्षांपासून पाणीटंचाईची झळ सहन करीत आहे. वाड्या-तांड्यांमध्ये पाण्यासाठी हाहाकार असतो. बेलोरा जिल्हा परिषद सर्कलमधील जलस्रोत आटले आहे. त्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून २० गावांना पाणीच मिळत नाही. मारवाडी खुर्द, मारवाडी बु., वसंतवाडी, रोहडा, मांजरजवळा, बेलोरा, कुंभारी, हनुमाननगर, पांढुर्णा, छोटा बेलोरा, कान्हेरवाडी, वाघजाळी, आसोला, पन्हाळा, म्हैसमाळ, हनवतखेडा, नांदुरा, सत्तरमाळ, पिंपळगाव या गावातील ३३ हजार नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहाटे ५ वाजतापासून पाण्यासाठी दोन तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. पाणीपुरवठा योजना असूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते, ही शोकांतिका आहे. फेट्रा येथे महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेतून प्रत्येक गावांना पाईपलाईन टाकण्यात आली आहे. वसंतवाडी ते पिंपळगाव या रस्त्यावरील पाईपलाईनला मोठी गळती लागली आहे. तसेच मारवाडी ते रोहडा या रस्त्यावर चार ठिकाणी पाणी धो-धो वाहते. रोहडा ते बेलोरा या रस्त्यावर असलेल्या लिकेजमुळे हजारो लिटर पाणी वाहून जात आहे. लिकेजमुळे पाणी माती मिश्रीत होत असल्याने ते पिण्यायोग्यही राहत नाही. त्यामुळे नागरिकांना विहिरीवरून पाणी आणावे लागते. मारवाडी, वसंतवाडी, हनुमाननगर व इतर तांड्यातील नागरिक मारवाडी बु. येथील रस्त्यालगत असलेल्या संतोष मुराई यांच्या शेतातील विहिरीवरून पाणी आणतात. पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंंता वाशिम येथून जाणे येणे करतात. त्यामुळे त्यांचे याकडे लक्ष नाही. उन्हाच्या दाहकतेसोबत पाणीटंचाईचा प्रश्नही उग्ररुप घेत आहे. गळतीची कामे मार्च-एप्रिलमध्ये पूर्ण करण्याऐवजी आता या कामाला सुरुवात करणार असल्याचे समजते. गावकर्‍यांना पाणी केव्हा मिळणार हा प्रश्न आहे. कनिष्ठ अभियंता आणि कंत्राटदाराच्या संगनमतानेच २० गावातील नागरिकांना १५ दिवसांपासून पाणीपुरवठा होत नाही, असा आरोप आहे. विशेष म्हणजे एप्रिल ते जून या महिन्याच्या संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात मारवाडी खुर्द, पन्हाळा, म्हैसमाळ या गावांचा समावेश आहे. या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आराखड्यात मंजूर आहे. आता मे महिना संपला तरी अद्याप टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला नाही. विशेष म्हणजे १५ दिवसांपासून नागरिक पाण्यासाठी पायपीट करीत आहे. भारनियमनाचे चटके पाणीटंचाई उग्र होण्यात भारनियमनाचाही मोठा हातभार आहे. वीज पुरवठा सुरळीत राहत नसल्याने गावागावातील पाण्याच्या टाक्या भरण्यास विलंब लागतो. परिणामी पाणीटंचाई तीव्र रुप घेत आहे. सोमवार ते गुरुवार पहाटे ५ ते सकाळी ९.३० आणि शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० पर्यंत भारनियमन असते. त्यामुळे पाणीपुरवठा योजना पूर्णत: ठप्प असते.

Web Title: 20 villages thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.