पालकमंत्र्यांचे उमरखेडमध्ये सलग १५ तास समाधान शिबिर
By Admin | Updated: June 6, 2015 23:59 IST2015-06-06T23:59:31+5:302015-06-06T23:59:31+5:30
पालकमंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेले समाधान शिबिर जिल्ह्यातील सामान्य नागरीकांसाठी खऱ्या ....

पालकमंत्र्यांचे उमरखेडमध्ये सलग १५ तास समाधान शिबिर
रात्री ३ वाजता थांबले काम : ७० टक्के तक्रारींचा जागेवर निपटारा
उमरखेड : पालकमंत्री संजय राठोड यांच्या कल्पनेतून साकारलेले समाधान शिबिर जिल्ह्यातील सामान्य नागरीकांसाठी खऱ्या अर्थाने दिलासा देणारे ठरत आहे. केवळ शिबिरात तक्रार दाखल झाल्यामुळेही अनेकांची कामे प्रशासकीय स्तरावर गतीने होऊ लागली आहे. उमरखेड येथे शुक्रवारी झालेल्या शिबिरात अनेक तक्रारींचा हातोहात निपटारा झाला. रात्री तब्बल तीन वाजेपर्यंत हा जनता दरबार सुरू होता.
उमरखेड येथील शिबिराने वेळेचा विक्रम केला. दुपारी १२ वाजता शिबिरास सुरूवात झाली आणि १५ तास म्हणजे रात्री ३ वाजतापर्यंत शिबिर सतत सुरू होते. सायंकाळी ८.३० पर्यंत २५० तक्रारींवर सुनावणी झाली होती. त्यानंतर प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत त्याचा निपटारा करतांनाच मध्यरात्र ओलांडली. शेवटच्या तक्रारकर्त्यासोबतही पालकमंत्र्यांनी आणि आमदार राजेंद्र नजरधने यांनी त्याच आत्मियतेने चर्चा केली.
या शिबिरात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे शिबिरात तातडीने निर्णय होत असल्याचा प्रत्यय विभागातील जनतेला आला. शामराव भुजंगराव बारशेटवार या शेतकऱ्याने हळद प्रक्रीया यंत्र अनुदानावर घेतले होते. परंतु अनेक दिवसांपासून त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याची तक्रार होती. पालकमंत्र्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कृषी आयुक्तांशी थेट संपर्क साधून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिले होते. या शेतकऱासाठी तातडीने अनुदानाची तरतुद करण्यात आली. अर्चना खंडारे या विद्यार्थिनीस नाहरतक प्रमाणपत्राची आवश्यकता होती. पालकमंत्र्यांनी तातडीने तिला प्रमाणपत्र उपलब्ध करून दिले. उमरखेड तालुक्यातील बंदी भागात वन्य प्राण्यांचे जनावरांवर हल्ले होतात. परंतु एखाद्या शेतकऱ्याकडे तीन पेक्षा जास्त जनावरे असल्यास हल्ला होऊनही मदत दिली नाही. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता पालकमंत्र्यांनी रात्रीच वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधून याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगितले.
मुळावा येथील महिला बचतगटाने किरकोळ केसोसिन परवाना मिळावा म्हणून अर्ज केला होता. सदर परवाना तातडीने उपलब्ध करून द्यावा, असे निवेदन शिबिरात सादर केले होते. या गटास पालकमंत्र्यांच्या हस्ते शिबिरातच परवान्याचे वितरण करण्यात आले. शिबिरात अनेकांना फेरफार, सातबारा तातडीने उपलब्ध करून देण्यात
आले.
याशिवाय विलास चव्हाण, रमेश गायकवाड, रामराव गायकवाड, रविंद्र जैन, संजय बिजोरे, चक्रधर देवसरकर, शिवाजी माने, सतीश वानखेडे, शांताबाई पवार, चितंगराव कदम, गजानन कदम, उत्तम जाधव, उत्तम राठोड, आदिनी तक्रारी केल्या. या शिबिरात आलेल्या तक्रारीपैकी ७० टक्के तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
सर्व उपविभागीय स्तरावर सदर शिबिर होऊ घातले आहे. वणी, यवतमाळ, दारव्हा येथील शिबिरानंतर उमरखेड येथील चौथे शिबिर होते. (शहर प्रतिनिधी)