जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्येच्या दारातून परत

By Admin | Updated: April 29, 2016 02:36 IST2016-04-29T02:36:43+5:302016-04-29T02:36:43+5:30

आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला.

15 farmers from the district returned from the suicide door | जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्येच्या दारातून परत

जिल्ह्यातील १५ शेतकरी आत्महत्येच्या दारातून परत

प्रेरणा प्रकल्प : शेतकरी मित्र कक्षाची पाच महिन्यांतील फलश्रूती, शेतीसोबतच जोडधंदाही स्वीकारला
यवतमाळ : आत्महत्येचा विचार ज्यांच्या मनावर हावी झाला, अशा शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी शासकीय रूग्णालयात शेतकरी मित्र कक्ष सुरू करण्यात आला. गेल्या पाच महिन्यात या कक्षामुळे १५ शेतकऱ्यांना आत्महत्येच्या दारातून परत आणण्यात यश आले आहे. तर १८० शेतकरी औषधोपचार घेत आहेत. हे शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंदाही करीत आहे.
मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांसाठी जिल्ह्यात प्रेरणा प्रकल्प सुरू झाला. त्या अंतर्गत वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात शेतकरी मित्र कक्ष स्थापन करण्यात आला. पाच महिन्यातील या कक्षाचा अनुभव आशादायी ठरला. सुरुवातीच्या काळात कक्षाबाबत जिल्ह्यात पुरेसा प्रचार न झाल्याने प्रतिसाद अत्यल्प होता. शिवाय, शेतकऱ्यांवर मनसोपचार करणार, म्हणजे शेतकऱ्यांना वेडे समजता का, असा प्रश्नही अनेकांनी उच्चारवात उपस्थित केला होता.
परंतु, आता या कक्षात दररोज ४०-४५ शेतकरी स्वत:हून उपचारासाठी येतात. त्यातील सर्वच मानसिक रूग्ण नसतात. पण ४-५ जण निराशाग्रस्त आढळतात. कक्षातील मनसोपचार सामाजिक कार्यकर्त्या किरण दिघडे म्हणाल्या, येथे येणाऱ्या शेतकऱ्यांची मानसिक खचलेपणाची अवस्था तीन प्रकारची असते. सौम्य, मध्यम आणि तीव्र. सौम्य प्रकारातील शेतकऱ्याचे समुपदेशन केले जाते. त्याला १५ दिवसांनी पुन्हा बोलावले जाते. मध्यम प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच विविध शेतीविषयक योजनांची माहिती दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञांना बोलावले जाते. तर तीव्र प्रकारातील शेतकऱ्याला समुपदेशनासोबतच तातडीने औषधोपचार सुरू केला जातो. सध्या १८० शेतकऱ्यांवर अशा प्रकारचा औषधोपचार सुरू आहे. कक्षातील डॉ. सरफराज अहमद सौदागर म्हणाले, नैराश्य आणि मनोरुग्ण यात फरक आहे. मेंदूतील सेरोटोनीन द्रव कमी झाल्यास तीव्र निराशा येते. अशा शेतकऱ्यांवर तातडीने औषधोपचार हाच उपाय आहे.
यवतमाळजवळील शेतकरी शासकीय रुग्णालयातील शेतकरी मित्र कक्षात स्वत: येऊ शकतात. मात्र, झरी-उमरखेडसारख्या दूरस्थ तालुक्यातील शेतकऱ्यांना या कक्षाची माहितीही नसते. म्हणून प्रेरणा प्रकल्पाने गावागावातील आशा स्वयंसविकांवर जबाबदारी दिली आहे. निराशाग्रस्त शेतकरी कसा ओळखायचा याचे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. निराशाग्रस्त शेतकरी शोधून त्या शेतकरी मित्र कक्षात घेऊन येतात. (स्थानिक प्रतिनिधी)

प्रेरणा प्रकल्पाला बळीराजा चेतना अभियानाचे पाठबळ
वासरीचा शेतकरी असा झाला सुखी !
घाटंजी तालुक्यातील शेतकरी विजय चिकाटे यांना मुलीच्या लग्नासाठी कर्ज घ्यावे लागले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यांना शेतही विकावे लागले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा मार्ग बंद झाला आणि त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळू लागले. गावातील अशा स्वयंसेविकेच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी विजय यांना शेतकरी मित्र कक्षात आणले. येथे त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जोडधंद्यांची माहिती देण्यात आली. एवढेच नव्हेतर, बळीराजा चेतना अभियानातून गावाला मिळालेल्या निधीतून पाच हजार रुपये शेतकऱ्याला देण्यात आले. या पैशातूनच विजय चिकाटे यांनी वासरी गावातच छोटेसे चहाटपरी वजा हॉटेल सुरू केले आहे. लोकांना तलफ भागवून तेही जीवनाचा आनंद घेत आहेत.

Web Title: 15 farmers from the district returned from the suicide door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.