पुसद शहरात एका महिन्यात १४ घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2015 00:07 IST2015-06-01T00:07:37+5:302015-06-01T00:07:37+5:30
शहरात पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.

पुसद शहरात एका महिन्यात १४ घरफोड्या
१४ लाखांचा ऐवज लंपास : शंकरनगर परिसर चोरट्यांचे टार्गेट
पुसद : शहरात पोलीस विभागाच्या नाकर्तेपणामुळे गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्यांचे सत्र सुरू आहे. गेल्या एका महिन्यात लूटमार, घरफोडी व चोरीच्या तब्बल १४ घटना घडल्या आहे. यामध्ये १४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. यातील अधिकांश घटना शंकरनगर परिसरातील आहे. त्यातही बंद घरे चोरट्यांनी टार्गेट केल्याने घराला कुलूप लावून बाहेरगावी जायचे की नाही, असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. उल्लेखनीय म्हणजे अद्यापही एकाही घटनेचा तपास पोलीस लावू न शकल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे.
१ मे रोजी ज्येष्ठ महिला ताई देशपांडे या गजानन महाराज मंदिरात जाण्यासाठी निघाल्या असता मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. यामध्ये ६० हजार रुपयांची लूटमारी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर चार-पाच दिवसांच्या कालावधीतच बंटी काबरा नामक व्यापाऱ्याला रात्री ८.३० च्या सुमारास इंद्रप्रस्थनगराजवळ अज्ञात लुटारूंनी मिरची पूड डोळ्यात फेकून लुटण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर लुटारूंनी शिवाजी चौकात कनोजे यांच्या मोटरसायकलला धडक देवून त्यांना मारहाण केली आणि फरार होण्यात यशस्वी झाले.
या घटनांना २० दिवस लोटूनही आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले नाही. १६ मे रोजी एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी व चोरीच्या घटना घडल्या. शंकरनगरातील सतीश रहांगडाले यांच्या घरी स्वयंपाक खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात शिरून बेडरूममध्ये असलेल्या कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, साखळी आदी एक लाख रुपयांचा ऐवज व ६० हजार रुपये रोख असा एकूण अडीच लाखांचा माल चोरून नेला. त्याच रात्री शिवराज पार्कमध्ये सुदर्शन ढाले या शिक्षकाच्या घरीसुद्धा डल्ला मारून चोरट्यांनी ५६ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले.
शंकरनगराजवळील रामनगरातील भाऊ पोदुटवार यांच्या घरी चोरट्यांचा चोरीचा डाव मात्र फसला. परंतु चौकीदाराला मात्र त्यांनी बेदम झोडपले. देशमुखनगरात वैभव वांझाळ यांच्या घराला त्यानंतर चोरट्यांनी लक्ष्य केले. परंतु वांझाळ कुटुंबीय जागे असल्यामुळे चोरट्यांचा डाव पुन्हा एकदा फसला. पाचव्या चोरीत इटावा वॉर्डातील किशोर तोष्णीवाल यांच्या दालमिलमधून पाच क्विंटल तूर डाळ चोरट्यांनी लंपास केली. या ठिकाणी ५० हजारांचा माल चोरी गेला. एकंदरीत १६ मेच्या एकाच रात्री ५ ठिकाणी चोरट्यांनी चोऱ्या करून तीन लाखांपेक्षा अधिकचा माल लंपास केला. या घटनेनंतर शहर पोलीस ठाण्याजवळील मुखरे चौकातील जोगदंडे यांच्या घरातून चोरट्यांनी गॅस सिलिंडर चोरून नेले. २० मे रोजी डुब्बेवार ले-आऊटमध्ये एका शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी चोरी केली. २९ मे रोजी तर रामनगरातील शासकीय कंत्राटदार जयंत चिद्दरवार यांच्याकडे बंदुकधारी सहा दरोडेखोरांनी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास दरोडा घालून दहा लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. संपूर्ण शहर जागेच असताना ही घटना घडली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याच रात्री गांधीनगरातील विजय राठोड यांच्या घरीही घरफोडी करून चोरट्यांनी पाच ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व दोन हजार रुपये रोख चोरून
नेले. यावेळी राठोड हे बाहेरगावी गेले होते.
तसेच १६ ते १८ मेच्या दरम्यान शंकरनगरातील श्याम जोशी यांच्या घरी घरफोडी झाली. यावेळी जोशी हे पुण्याला गेले होते. चोरट्यांच्या हाती या ठिकाणी फारसा माल लागला नाही. वाठ यांच्या घरी तर दोन वेळा घरफोडी करण्यात आली. पहिल्या घरफोडीत चोरट्यांना फारसे काही या ठिकाणी मिळाले नाही. परंतु दुसऱ्यावेळी त्यांनी घरातील गॅस सिलिंडरच लंपास केले. अशा प्रकारे मे महिन्यात पुसद शहरात १४ ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. पोलिसांना मात्र त्याचे काहीही सोयरसूतक नाही. एका महिन्यातील १४ घरफोड्यांवरून हे दिसून येते. एकंदरीत ठाणेदाराच्या अकार्यक्षमतेमुळे पोलीस प्रशासनाची इभ्रत वेशीला टांगल्या जात आहे. दरोडेखोरसुद्धा नागरिकांना दम देवू लागले आहे. त्यांच्यावर पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला नाही. दिवसा कॉलनी, वसाहती व रस्त्यांमध्ये वारंवार घिरट्या घालून टेहाळणी करायची, कुलूपबंद घरे शोधून ठेवायची, आजूबाजूचे कुटुंब रात्री कधी झोपतात आदी माहिती गोळा करायची आणि रात्रीच्या सुमारास अशा घरांना लक्ष्य करून चोरी करायची, हा उद्योग
चोरट्यांचा आता नित्याचाच झाला आहे.
सध्या विस्तारित भागातील बंद घरे चोरट्यांनी टार्गेट केले आहे. एका महिन्यातील अनेक चोरी प्रकरणातील एकाही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचासुद्धा आपल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक उरलेला नाही. पोलीस प्रशासन कमालीचे सुस्तावले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे रोष
पुसद शहरातील वाढत्या चोरी व दरोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांकडून वाढती गुन्हेगारी रोखण्यास कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. पोलिसांची रात्रीची गस्त फारसी प्रभावी ठरताना दिसत नाही. चोऱ्या होत असताना एकाही आरोपीला पकडण्यात यश आले नाही.