पाणी पुरवठ्यासाठी १२ टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 02:15 IST2015-05-15T02:15:58+5:302015-05-15T02:15:58+5:30
यंदा अपुरा पाऊस कोसळूनही जिल्ह्यात कुठेही तीव्र पाणीटंचाईचा भडका उडाला नाही.

पाणी पुरवठ्यासाठी १२ टँकर
यवतमाळ : यंदा अपुरा पाऊस कोसळूनही जिल्ह्यात कुठेही तीव्र पाणीटंचाईचा भडका उडाला नाही. सलग सुरू असलेल्या अवकाळी पावसाने पाणीटंचाईत प्रशासनाला दिलासा दिला. मात्र जिल्ह्यातील १२ गावांना बारा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नेहमीप्रमाणे वेळ प्रशासनावर आली आहे. पाणीटंचाई निवारणार्थ १६० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले असून यंदा पाणीटंचाईच्या प्रश्नावरुन प्रशासन मात्र रिलॅक्स दिसत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात उन्हाळा आणि पाणीटंचाईचे कायम नाते आहे. दरवर्षी त्याच त्या गावात पाणी टंचाई निर्माण होते. प्रशासन लाखो रुपयांचा कृती आराखडा तयार करून उपाययोजना करते. यंदाही प्रशासनाने १६ ही पंचायत समितीच्या पाणीटंचाई कृती आराखड्याला मान्यता दिली आहे. नऊ कोटी ९९ लाख ४० हजार रुपयांचा जिल्ह्याचा पाणीटंचाई आराखडा मंजूर झाला आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता नसली तरी अनेक गावात पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. तर काही गावात पाण्याचा थेंबही नसल्याने प्रशासनाने त्या गावांसाठी टँकरने पाणी पुरविणे सुरू केले आहे.
त्यात पुसद तालुक्यातील बाळवाडी, उपवनवाडी, अनसिंग, उल्हासवाडी, म्हैसमाळ, कारला, मारवाडी, वडसद तांडा, राळेगाव तालुक्यातील कारेगाव, नेर तालुक्यातील चिकणी डोमगा, आर्णी तालुक्यातील सुधाकरनगर व चिमटा, यवतमाळ तालुक्यातील भांबराजा, घाटंजीतील पारवा या गावांचा समावेश आहे. यासोबतच प्रशासनाने खासगी विहिरींचे अधिग्रहण करून तब्बल १६० ठिकाणी पाण्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. यामध्ये उमरखेड तालुक्यात ६२, वणी तीन, दिग्रस २०, आर्णी २८, मारेगाव पाच, पुसद १६, कळंब दोन, नेर आठ, राळेगाव तीन, दारव्हा पाच, यवतमाळ १२ अशा विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.
याशिवाय १८६ गावांमध्ये १९० विंधन विहिरी तयार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यातील १०२ विंधन विहिरी योग्य असून ८४ ठिकाण अयोग्य असल्याचे आढळून आले. यापैकी १०० विंधन विहिरींचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला असून ९६ प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. ६९ विंधन विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. यवतमाळ तालुक्यातील रूईवाई येथे दोन विंधन विहिरी, घाटंजीतील शिवणी, घाटुंबा, राजूरवाडी येथे प्रत्येकी एक विंधन विहीर आराखड्या व्यतिरिक्त मंजूर करून घेण्यात आली आहे. तात्पुरती नळ योजना दुरुस्तीसाठी ५९ लाख ५० हजाराची तरतूद असून १५ अंदाजपत्रके तयार करण्यात आली आहे. त्यातील दहा अंदाजपत्रकांना जिल्हा प्रशासनाची मंजुरी मिळाली आहे. नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी पाच कोटी १३ लाख रुपये मंजूर आहेत. यातील ९६ लाख ६० हजार आतापर्यंत खर्च झाले आहेत. त्यातून तब्बल १९९ गावांमध्ये दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे.
यातील २५ कामे सुरू झाली असून ३५ कामांची निविदा प्रक्रिया चालू आहे. यवतमाळ तालुक्यातील जामडोह, दिग्रस येथील आनंदवाडी, घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी, पांढरकवडा तालुक्यातील घोन्सी, भाडउमरी येथील नळ योजना विशेष दुरुस्तीच्या कामाला आराखड्याव्यतिरिक्त मंजुरी देण्यात आली आहे. प्रशासनाची तयारी जोरात असली तरी यावर्षी पाणीटंचाईवरून कुठेही जनक्षेभाला सामोरे जावे लागले नाही. पाणीटंचाई असली तरी त्याची तीव्रता मोठी नसल्याने नागरिकही सहन करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)