१२ अपघात, २२ बळी
By Admin | Updated: April 29, 2016 02:27 IST2016-04-29T02:27:23+5:302016-04-29T02:27:23+5:30
अनियंत्रित वेग आणि क्षणभरासाठी झालेली नजरचूक अपघातास कारणीभूत ठरत असून जिल्ह्यात गत दोन आठवड्यात विविध १२ अपघातात २२ जणांचा बळी गेला.

१२ अपघात, २२ बळी
दोन आठवडे : ट्रॅक्टर आणि ट्रक झाले अपघाताचे कारण
यवतमाळ : अनियंत्रित वेग आणि क्षणभरासाठी झालेली नजरचूक अपघातास कारणीभूत ठरत असून जिल्ह्यात गत दोन आठवड्यात विविध १२ अपघातात २२ जणांचा बळी गेला. ट्रक आणि ट्रॅक्टर अपघाताचे तत्कालिक कारण ठरले असले तरी घाईच त्यामागचे मोठे कारण आहे.
अपघात सांगून येत नाही. काळ कुणावर घाला घालेल याचा नेम नाही. लग्नसराईच्या काळात दरवर्षी अपघाताची संख्या वाढते. यंदाही तसेच झाले. एप्रिलच्या अवघ्या १५ दिवसात तब्बल १२ अपघात झाले. संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणारा दोन दुचाकींचा अपघात पुसदनजीक २० एप्रिल रोजी दुपारी झाला. यात हर्षी आणि चिलवाडी येथील सात तरुण ठार झाले. ट्रॅक्टरला ओव्हर टेक करताना दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि सात जणांचा बळी गेला. यवतमाळच्या चौसाळा मार्गावर १४ एप्रिल रोजी ट्रॅक्टरला ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार आई, मुलगी आणि एक तुरणी ठार झाल्यात.
मारेगावजवळ २५ एप्रिलच्या रात्री शिक्षक व त्यांची पत्नी दुचाकीने येत असताना दुभाजकावर आदळून दोघेही ठार झाले. त्याच दिवशी सकाळी दारव्हा मार्गावरील उमरठा नर्सरीत वॅगनआर कारच्या धडकेत दिवसाचा तरुण ठार झाला. संतप्त नागरिकांनी कार पेटवून देवून आपला संताप व्यक्त केला. उमरखेड तालुक्यातील जेवली येथे लग्नासाठी येणाऱ्या महिलेचा ट्रॅक्टरनेच बळी घेतला. दुचाकीला धडक दिल्याने महिला ठार तर तिचा चिमुकला गंभीर जखमी झाला. आर्णी तालुक्याच्या कोसदनी घाटात दुचाकीस्वार महिला ट्रकखाली येण्याची घटना २३ एप्रिल रोजी घडली. २१ एप्रिल रोजी यवतमाळलगतच्या पिंपळगाव येथील तरुणाला पांढरकवडा मार्गावारील रामपूरजवळ ट्रकने उडविले. दुचाकीस्वार हेल्मेटही घालून होता. २० एप्रिल रोजी केळापूर येथे अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने इसम ठार झाला, तर १९ एप्रिल रोजी दिग्रस तालुक्यातील सिंगदजवळ कारला ट्रकने धडक दिली. त्यात पोलीस शिपाई जागीच ठार झाला. आर्णी पंचायत समितीचे कर्मचारी लग्नासाठी मराठवाड्यात गेले होते. वारंगा फाट्याजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. त्यात लिपिकाला प्राण गमवावा लागला. पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा मार्गावर एका टिप्परने दुचाकीला धडक दिल्याने दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना १६ एप्रिल रोजी घडली. तर १४ एप्रिल रोजी जोडमोहाजवळ कार उलटून एक जण ठार झाला. (नगर प्रतिनिधी)
धडा कधी घेणार ?
उन्हाळा म्हणजे लग्नसराई आणि या लग्नसराईत अपघाताने विघ्न येण्याचे प्रमाणही वाढले आहे. बहुतांश अपघात दुपारच्या वेळीच झाल्याचे दिसून येते. अपघातांच्या कारणांची मीमांसा होईल. पोलीस संबंधितांवर कारवाईही करतील. परंतु, या अपघातापासून कुणी धडा घेतील, असे दिसत नाही.