तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण
By Admin | Updated: September 1, 2014 23:54 IST2014-09-01T23:54:53+5:302014-09-01T23:54:53+5:30
लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून

तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण
जिल्ह्यात प्रकोप : शासकीय यंत्रणा गाफीलच
सुरेंद्र राऊत -यवतमाळ
लांबलेला पावसाळा, तापणारे वातावरण आणि अधामधात कोसळणारा पाऊस अशा विषम वातावरणात जिल्ह्यात साथीच्या आजाराने डोकवर काढले आहे. गत तीन महिन्यात डेंग्यूचे ११५ रुग्ण आढळून आले असून त्यात सातत्याने वाढ होत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या आणि मृतांची कुठलीही नोंद शासकीय यंत्रणेकडे उपलब्ध नाही. किटकजन्य आजाराचा प्रकोप होत असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र सर्वकाही आलबेल असल्याचे चित्र आहे.
यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. डेंग्यूच्या तापावर थेट उपचार नसल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. एकट्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात ११५ रुग्णांना डेंग्यू असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. जून महिन्यात सात रुग्ण तपासणीस आले होते. जुलैमध्ये हीच संख्या ४३ वर गेली. तर आॅगस्ट महिन्यात डेंग्यूचे ६५ रुग्ण दाखल झाले. हा केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांचा आकडा आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची कुठेही नोंद होत नाही. त्यामुळे अधिकृत आकडेवारी उपलब्ध होत नाही. यावर्षी सर्वाधिक तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असल्याचे खासगी डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ असतानाही आरोग्य यंत्रणेकडून मात्र विशेष असे कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही.
शासकीय रुग्णालयामध्ये तीन महिन्यात दोन रुग्णांना डेंग्यूमुळे मृत्यू झाला. तर शहरातील खासगी रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूच्या प्रकोपापासून आरोग्य यंत्रणा अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. (कार्यालय प्रतिनिधी)