ग्रामपंचायतींसाठी ११ हजार नामांकन

By Admin | Updated: July 12, 2015 02:33 IST2015-07-12T02:33:03+5:302015-07-12T02:33:03+5:30

दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतीच्या ४ हजार २८२ जागांसाठी ११ हजार १९० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे.

11 thousand nominations for the Gram Panchayats | ग्रामपंचायतींसाठी ११ हजार नामांकन

ग्रामपंचायतींसाठी ११ हजार नामांकन

यवतमाळ : दुसऱ्या टप्प्यातील ५०२ ग्रामपंचायतीच्या ४ हजार २८२ जागांसाठी ११ हजार १९० उमेदवारांनी नामांकन दाखल केले आहे. नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तब्बल सात हजार उमेदवारांनी नामांकन दाखल केले. तर पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरविल्याने या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. गावागावात निवडणुकीचा ज्वर चढला असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ५०२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक तर १२८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार १० जुलै होती. ४ ते ९ जुलैपर्यंत चार हजार उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. शेवटच्या दिवशी नामांकन दाखल करणाऱ्यांची एकच गर्दी झाली. सात हजार उमेदवारांनी संबंधित तहसील कार्यालय नामांकन दाखल केले. एकाच दिवशी एवढी मोठी गर्दी झाल्याने प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. त्यातच सर्व्हर डाऊन झाल्याने काही काळ नामांकनाची प्रक्रिया खोळंबली होती. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने दीड तासाचा अवधी वाढवून दिला. त्यामुळे अर्जांची जुळवाजुळव करण्याला प्रशासनाला दुसरा दिवस उजाडला.
जिल्ह्यात सर्वाधिक उमरखेड तालुक्यात १ हजार ३११ उमेदवारांनी नामांकन दाखल केले तर सर्वात कमी मारेगाव तालुक्यात ११ ग्रामपंचायतीसाठी २०३ नामांकन दाखल झाले. १६१२ प्रभागातून ही निवडणूक लढविली जाणार आहे. त्यात ५३७ जागा अनुसूचित जाती, ८५७ जागा अनुसूचित जमाती, १०६२ जागा नामाप्रच्या तर १८२२ जागा खुल्या प्रवर्गातील आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: 11 thousand nominations for the Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.