१०७ शेतकरी आत्महत्या अपात्र
By Admin | Updated: June 19, 2015 02:16 IST2015-06-19T02:16:24+5:302015-06-19T02:16:24+5:30
कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

१०७ शेतकरी आत्महत्या अपात्र
महागाव : कर्जबाजारीपणा व नापीकीने कंटाळून तालुक्यात गत १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. मात्र यातील तब्बल १०७ शेतकरी मदतीस अपात्र ठरले. शासकीय निकषात बसत नसल्याने शासनाने या शेतकरी आत्महत्या नाकारल्या आहेत. त्यांचे कुटुंब आज उघड्यावर आले आहे.
महागाव तालुक्यात ६० हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र आहे. त्यापैकी ५० हजार हेक्टर कोरडवाहू आहे. ३० हजार शेतकऱ्यांचा प्रामुख्याने शेती हाच व्यवसाय आहे. गत काही वर्षात नापिकी आणि कर्जबाजारीपणाने शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची झाली आहे. अशा स्थितीत २००१ ते जून २०१५ पर्यंत १६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मुख्य कारण म्हणजे कर्जबाजारीपणा होय. कर्जाचा हा डोंगर धरणाचे पाणी वेळेवर न मिळणे, बनावट बियाणे आणि खंडीत वीज पुरवठा यामुळे वाढत गेला. तालुक्यात वेणी, वडद, पिंपळगाव, अमडापूर, बेलदरी आदी प्रकल्प आहेत. १० हजार हेक्टर सिंचन क्षमतेचा अधरपूस प्रकल्प आहे. परंतु पूर्ण क्षमतेने सिंचन होत नसल्याने तालुक्याच्या उत्पादनात घट होत आहे. यातून शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत. धरणाच्या पाण्यासाठी आंदोलने झालीत परंतु तिळमात्र सुधारणा झाली नाही. गत काही वर्षात बोगस बियाण्यातून शेतकरी नागवला गेला. भारनियमनाने ओलित करणे शक्य झाले नाही. अशात शेतकऱ्यांच्या हाती विषाचा प्याला कधी आला हेच कळले नाही.
महागाव तालुक्यात १३ वर्षात १६८ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. शेतकरी आत्महत्येनंतर मदतीसाठी काही निकष शासनाने घालून दिलेले आहे. त्या निकषांची पूर्तता या अडाणी शेतकऱ्यांनी केली नाही. म्हणून १०७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने फेटाळल्या आहेत. शेतकरी आत्महत्या खरी की खोटी हे ठरविण्यासाठी जिल्हास्तरावर समिती आहे. या समितीने नुकताच हा निर्णय दिला आहे. शासनाच्या मदतीशिवाय आत्महत्या केलेल्यांच्या विधवा पत्नीने आपला संसार सांभाळला आहे. ज्या-ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अपवाद वगळता अनेक महिलांनी आता शेती करण्यासाठी कंबर कसली आहे. (शहर प्रतिनिधी)