उंबर्डा बाजार --- ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेली ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालये जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षित कारभारामुळे शोभेची वास्तू झाली आहेत.
ग्रामीण भागात वाचन संस्कृती वाढावी, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून दैनंदिन घडामोडी शेवटच्या घटकातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने शासनाच्यावतीने सार्वजनिक वाचनालये सुरू केली. मात्र, अनेक गावांमध्ये वाचनालयाच्या नावाचा साधा नामफलकसुद्धा नसल्याने वाचकांत गावात वाचनालय आहे की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे अनेक वाचनालयांत नियमित वर्तमान पत्रे येत नसून केवळ महिना भरल्यानंतर दोन, चार वर्तमानपत्रांची महिनाभराची रद्दी एकदाच खरेदी करून वाचनालयात दाखविण्यात येत असल्याने वाचकांना वर्तमानपत्रांतून दैनंदिन नियमित मिळणाऱ्या घडामोडीपासून वंचित राहावे लागत आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील सार्वजनिक वाचनालयाकडे विशेष दुर्लक्ष करून तपासणीच्या नावाखाली केवळ वसुली मोहीम राबविण्यात येत असल्याने ग्रामीण भागातील वाचकांना पुस्तके तथा वर्तमानपत्र वाचनापासून वंचित राहावे लागत आहे.