वाशिम : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीसाठी आतापासूनच आरक्षण मिळावे यासाठी प्रवाशांची धडपडही सुरू झाली आहे. वाशिममार्गे सध्या ८ रेल्वे धावत आहेत. रेल्वे प्रवासाला पसंती मिळत असली तरी कोरोनाविषयक नियमांचे पालन योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे.
०००००
लांब पल्ल्याच्या आरक्षणाला प्राधान्य
सणासुदीच्या काळात तसेच आगामी दिवाळीदरम्यान ऐनवेळी गैरसोय होऊ नये म्हणून तिरुपती, नागपूर, जयपूर, सिकंदराबाद यासह अन्य लांब पल्ल्याच्या ठिकाणांचे आरक्षण काढण्याला प्रवाशांचे प्राधान्य असल्याचे दिसून येते. तूर्तास तरी लांब पल्ल्याच्या आरक्षण मिळत नाही, अशी परिस्थिती वाशिम येथे दिसून येत नाही.
०००००००
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
तिरुपती-अमरावती
नरखेड-काचीगुडा
जम्मुतावी-नांदेड
हैदराबाद-जयपूर
सिकंदराबाद-जयपूर
अमरावती-तिरुपती
००००००००००००००
सिकंदराबाद मार्गावर गर्दी कमी
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने व्यापार व उद्योगव्यवसाय सुरू झाल्यामुळे व सणासुदीच्या काळात नागरिकांची बाहेरगावी जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत सिकंदराबाद मार्गावर कमी गर्दी असल्याचे दिसून येते.
००००
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अजून संपलेला नाही. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणी रुग्णसंख्या वाढत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर कोरोनाविषयक नियमांचे पालन होणे आवश्यक ठरत आहे; परंतु रेल्वे प्रवासात अनेकजण मास्कचा वापर करण्याकडे तसेच सर्वसाधारण डब्यात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.