लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे टंचाई जाणवण्याची शक्यता कमी असून सद्या वाशिम आणि मालेगाव तालुक्यातील काही सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुग पिकाला पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांनी मंगळवार, १२ मे रोजी दिली.जिल्ह्यात गतवर्षी समाधानकारक पर्जन्यमान झाले. यासह जलयुक्त शिवार आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यातून नदी खोलीकरण, नाला सरळीकरणासह जलसंधारणाची विविध स्वरूपातील कामे झाली. त्याचा प्रत्यक्ष फायदा झाला असून जमिनीखालची पाणीपातळी वाढण्यास मदत मिळाली आहे. यासह जलस्त्रोतांची पातळी टिकून राहणेही शक्य झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पांमध्ये यंदा आतापर्यंत बºयापैकी पाणीसाठा शिल्लक असून तो आगामी बरेच दिवस टिकणार असल्याने चालूवर्षी तुलनेने पाणीटंचाईची शक्यता कमीच राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता बोरसे यांनी सांगितले. दरम्यान, वाशिम आणि मालेगाव या दोन तालुक्यांमध्ये उन्हाळी भूईमुगाचे पिक घेण्याचे प्रमाण अधिक असून शेतकºयांना त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी उपसा सिंचन पद्धतीने पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. कालव्यांव्दारे पाणी सोडणे सर्वच ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती बोरसे यांनी दिली.
सिंचन प्रकल्पांमधून २५० हेक्टरवरील भुईमुगाला पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:41 IST