राज्य शासनाने अचूक पीक पेरा कळण्यासाठी ई-पीक पाहणी हा उपक्रम राबविताना ई-पीक पाहणीचे टप्पे निश्चित केले आहेत. तसेच प्रकल्प अंमलबजावणी कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार १६ ते ३० सप्टेंबर असा पडताळणीचा कालावधी आहे. हा कालावधी अपुरा आहे. त्याकरिता काळ, काम, वेग या संकल्पनेचा विचार करण्यात आला नसल्याचे तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे मत आहे. विशेष म्हणजे ॲपवर माहिती भरताना पेरणी योग्य, पोटखराब, पडीतचे प्रकार, जलसिंचित, अजलसिंचित, किंवा तत्सम महसुली शब्द, त्यांचे अर्थ आणि वापर याची सामान्य शेतकऱ्यांना माहिती नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत असून, त्याचा विचार करण्यात आला नसल्यानेही प्रत्यक्ष पीक पेरा भरताना अनेक चुका होण्याची शक्यता असल्याचे मत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
-----------------
शेतकरी स्तरावरील त्रुटी-
१. शेतकऱ्यांसाठी हे ॲप पूर्णपणे फ्रेंडली दिसून येत नाही.
२. बऱ्याच खातेदारांना ॲप डाऊनलोड केल्यावर ‘इंटरनेट आवश्यक आहे’ असा मेसेज येतो आणि आपण सांगितलेल्या सर्व सेटिंग बदलल्या तरीदेखील एरर येत आहे.
३. पूर्ण माहिती भरल्यावर पिकाचा फोटो काढताना बऱ्याच जणांना ‘जीओ टॅग’ आवश्यक आहे, असा मेसेज येतो. त्यामुळे पिकाचा फोटो काढता येत नाही आणि माहिती अपलोड करता येत नाही.
४. मिश्र पीक, आंतर पीक भरताना शेतकऱ्यांची गल्लत होत आहे.
५. सर्वांत महत्त्वाचे जीओ टॅग असतानाही दुसऱ्याच्या शेतात जाऊन पण स्वतःच्या पिकाचा फोटो अपलोड करता येत आहे, ही सर्वांत मोठी त्रुटी दिसते.
-------------