हा उत्सव बालगोपालांचा आणि त्यांच्या छोट्या लाकडाच्या नंदींचा. राजे रघुजी भोसले (द्वितीय) यांनी १८०६ मध्ये ही प्रथा सुरू केल्याचा इतिहास आहे. हा उत्सव इतिहासात वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे या गावाने मोठ्या नंदींचा, चित्ररथांच्या मिरवणुकीसह तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा मागील १४४ वर्षांपासून जपली आहे. तान्हा पोळा हे वैदर्भीय संस्कृतीचे वेगळेपण आहे. कृषिप्रधान देशात शेतकरी आपल्या बैलांना पोळ्याच्या दिवशी तोरणात उभा करून कृतज्ञता व्यक्त करतो. हे संस्कार लहान मुलांवर पडावे, या उद्देशाने सुरू झालेली प्रथा आज संपूर्ण विदर्भात मोठ्या आनंदाने साजरी केली जात आहे. लहान मुले या दिवशी लाकडी, मातीच्या बैलांना सजवून घरोघरी जातात. त्यांना काही दक्षिणा दिली जाते व तोंड गोड केल्या जाते. यामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपल्या जाते. सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर या तान्हा पोळ्याचे मर्यादित स्वरूप पाहायला मिळत आहे. अशा स्वरूपाचा तान्हा पोळा येथील बालाजी मंदिरासमोर भवानीपंत काळू यांच्या हस्ते पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी काटिवेश परिसरातील बालगोपाल योगेश रंगभाळ, चेतन रंगभाळ, उमेश कथले, गोपाल रंगभाळ, विजय रंगभाळ, दीपक गाडे, पवन गाडे, राहुल काटकर, श्रीकांत रंगभाळ, अभी जाधव, धर्मेश पटेल, प्रशांत रंगभाळ व श्रीरंग रंगभाळ यांची उपस्थिती होती.
बालगोपालांचा तान्हा पोळा मंदिरासमाेर उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:42 IST