जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात कोरोनाबाधित आढळणाऱ्यांच्या संख्येत परिणामकारक घट झाली आहे. वाशिम, रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि मानोरा या सहा शहरांमध्ये आज रोजी बोटावर मोजण्याइतके रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. ग्रामीण भागातीलही बहुतांश गावे कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. ही बाब आशादायक असून नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, आरोग्य विभागाकडून शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पंचशील नगरमध्ये एकमेव कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आला. इतर पाच शहरे आणि ग्रामीण भागात एकही नवा रुग्ण आज निष्पन्न झालेला नाही. कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ४१ हजार ७२९ झाली असून आतापर्यंत ४१ हजार ७७ जणांना डिस्चार्ज मिळाला; तर ६३८ जणांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आजमितीस केवळ १३ कोरोनाबाधित व्यक्तींचा ‘ॲक्टिव्ह’च्या यादीत समावेश आहे. या व्यक्तींची प्रकृतीही चांगली असून त्यांनाही लवकरच डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. राठोड यांनी दिली.
................
कोट :
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने बाधित आढळणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत परिणामकारक घट झालेली आहे. असे असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून ॲन्टिजन आणि आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण कमी केलेले नाही. नागरिकांनीही लक्षणे आढळून येताच जिल्हा सामान्य रुग्णालयातील चाचणी केंद्रात येऊन कोरोनाची चाचणी करून घ्यावी. यात कुठलीही हयगय बाळगू नये.
-डाॅ. मधुकर राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम