लाटा धोक्याच्या ठरणार
By Admin | Updated: May 19, 2014 05:43 IST2014-05-19T05:01:27+5:302014-05-19T05:43:56+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत.
लाटा धोक्याच्या ठरणार
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील नाल्यांची साफसफाई ६० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी छोटे नाले अजूनही तुंबलेले आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिन्यात समुद्रकिनारी उठणार्या मोठ्या लाटा मुंबईकरांसाठी धोक्याच्या ठरणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत ऐन पावसाळ्यात पाणी साचून मुंबई तुंबण्याच्या घटना काही नव्या नाहीत. रस्त्यासह सखल भागात पाणी साचत असल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सखोल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा; म्हणून महापालिका प्रशासन पम्पिंग स्टेशनसह विविध उपाययोजना राबविण्याच्या तयारीत आहे. मात्र ऐनवेळी मुसळधार पाऊस आणि भरतीच्या वेळा एकत्र आल्यास समस्यांत आणखी भर पडते आणि मुंबापुरी जाम होते. या वेळच्या पावसाळ्यादरम्यान जुन आणि जुलै महिन्यांत साडेचार मीटर उंचीहून अधिक लाटा समुद्रकिनारी उठणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे मुंबई दीड-दोन तास पाऊस पडला तरी मुंबई तुंबणे काही नवे नाही. शिवाय पाण्याचा निचरा होत नसल्याने ऐन भरतीवेळी पाणी समुद्रात वाहत नाही़ परिणामी मुंबईकरांना समस्यांना सामोरे जावे लागते. दरम्यान, यावर्षीही नाले साफ झाल्याचा दावा पालिकेने केला असला तरी ऐन मोठ्या पावसात उठणार्या उंच लाटांनी मुंबईत पाणी साचून राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)