जलयुक्त शिवारवरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 23:34 IST2019-05-11T23:34:21+5:302019-05-11T23:34:34+5:30
कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता.

जलयुक्त शिवारवरील कोट्यवधीचा खर्च पाण्यात
पालघर : कुपोषणाच्या दाहकतेने काळवंडलेल्या पालघर जिल्ह्यातील तीन तालुक्यांना शेवटच्या दोन महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचा सामना करावा लागला होता. हे सावट दूर होते न होते तोच नेहमी प्रमाणे ग्रामीण भागातील तीन तालुके सध्या भीषण पाणीटंचाईच्या दाहकतेने होरपळून निघाले आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा चुराडा करणाऱ्या शासनाच्या ओंजळीमध्ये मात्र एक थेंब ही पाणी मिळालेले नसल्याचे दिसून आले आहे.
जिल्ह्यात शेवटच्या आॅगस्ट महिन्यात सरासरी (६२.७ टक्के) पेक्षा कमी (४६.९ टक्के) तर सप्टेंबर मध्ये ५७.१ टक्क्या पेक्षा अवघा ९.६ टक्के इतकाच पाऊस पडल्याने ५० पैशापेक्षा आणेवारी कमी भरलेल्या पालघर, विक्र मगड व तलासरी या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता.या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तेथील शेतकरी, विद्यार्थ्यांना अनेक सवलतींचा लाभ शासन पातळीवरून देण्यात आला होता.त्यात पीक कर्ज माफी, शेतकरी वीज पंप बिल वसुलीला स्थगिती, शेतसारा माफी, विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास आदींचा समावेश होता.
सध्या राज्यात दुष्काळाची दाहक परिस्थिती असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आपापल्या भागातील मंत्री, पालकमंत्री यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात अशा दौºयाचे कुठेही नियोजन असल्याचे दिसत नसून पालकमंत्री विष्णू सवरा तब्येत बरी नसल्याच्या कारणाने बाहेरच पडलेले नाहीत. जिल्ह्यात इतर राज्याप्रमाणे दुष्काळाच्या झळा दाहक नसल्या तरी पाण्याच्या गंभीर टंचाई ने चार तालुक्यात गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे.
मोखाडा तालुक्यातील २७ गावे व ६२ पाड्यात २४ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून जव्हार तालुक्यातील आठ गावे व १५ पाडे, वाडा तालुक्यातील ३ गावे २४ पाडे, विक्र मगड तालुक्यातील १ गाव व ४ पाडे असे एकूण ३९ गावे आणि १०५ पाडे या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. या चार तालुक्यातील ५४ हजार १३३ लोकांना पिण्याच्या एका थेंबासाठी कोरड्या पडलेल्या आजूबाजूच्या नदी-नाल्यांची पात्रात खड्डे खोदण्याची वेळ आली आहे.
शासनाने तीन
वर्षांचा हिशेब द्यावा!
सामाजिक वनीकरण विभागाने मोखाडा तालुक्यामध्ये २०१६-१७ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यासाठी ३.१७ लाख खर्च केला आहे. जलयुक्त शिवार अभियातून २०१५-१६ मध्ये मोखाड्यात ६०६ कामे करण्यात आली असून १८ कोटी ६८ लाख २९ हजार एवढा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये ९१ कामे करण्यात आली असून ४ कोटी १२ लाख ८१ हजाराचा खर्च झाला आहे. तर २०१७-१८ मध्ये ९ कामांवर ५८ लाख ४ हजार खर्च झाला असून गेल्या तीन वर्षात ७०७ कामांवर २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च झाला आहे. तरीही आदिवासींची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट कायम आहे.