वसई, विरार, नालासोपारा पुन्हा जलमय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 12:44 AM2019-09-05T00:44:06+5:302019-09-05T00:44:22+5:30

गंभीर म्हणजे बुधवारी समुद्राला मोठे उधाण आल्याने पश्चिम किनारपट्टीवरील अनेक गावांना त्याचा फटका बसला. काही ठिकाणी तलाव सुद्धा भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते

Wasai, Virar, Nalasopara again waterlogged! | वसई, विरार, नालासोपारा पुन्हा जलमय!

वसई, विरार, नालासोपारा पुन्हा जलमय!

Next

आशिष राणे 

वसई : अवघ्या राज्यात गणपतीची धूम सुरु असताना पालघर जिल्ह्यात पावसाने प्रचंड थैमान घातले असून गेली चार दिवस सुरु असलेल्या पावसाने वसई विरार च्या नागरिकांची वाट लाऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले आहे. जूनच्या अखेरच्या आठवड्यापासून ते आज पर्यंत तब्बल चार वेळा वसईत २०० मिली पेक्षा अधिक पाऊस पडल्याने अवघी वसई तुंबवली आहे. मात्र यावर उपाययोजना व नागरिकांना मदत करणे राहिले बाजूला महापालिका व महसूल यंत्रांणा कुठंही यावेळी मदत करतांना दिसून आली नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घरात, मंडपात असलेले गणपतींच्या पाटाखाली व मांडवात पावसाचे गुडघाभर पाणी साचून राहिले असल्याची स्थिती सध्या वसई विरार व नालासोपारा मध्ये आहे.

दरम्यान सोमवार रात्रीपासून संबंध तालुक्याच्या शहरी व ग्रामीण भागात ठीकठिकाणी पाणीच पाणी असून यात महापालिके सोबत ग्रामपंचायतीनी बांधलेली गटारे निकृष्ट आणि काही ठिकाणी पाणी जाण्याचा मार्गच बंद राहिल्याने रस्ते, महामार्ग आणि रेल्वे मार्ग याठिकाणी पाणीच पाणी साचून राहिले आहे. दुसरीकडे वसई, वसई गाव नवघर वसई पूर्वेला नेहमीप्रमाणे सर्व ठिकाणे जलमय झाली होती. तर दिवाणमान येथील सनसिटी-गास रास्ता तर पूर्णत: पाण्याखाली गेला. तर वसई नालासोपारा आणि तिथे उमेळा-नायगाव येथील काही भागाचा रस्ता हा रेल्वे लाईन च्या लगत असल्याने काही काळ रेल्वेच्या आजूबाजूला हि पाण्याची पातळी वाढताना दिसत होती, तर काही इमारती आणि उड्डाण पूलाच्या बाजूला पाणीच पाणी साचल्याने रस्त्या रस्त्यावर वाहतूकीची कोंडी होऊन त्याचा परिणाम दिवसभर वाहतुकीवर झाला.

गंभीर म्हणजे बुधवारी समुद्राला मोठे उधाण आल्याने पश्चिम किनारपट्टीवरील अनेक गावांना त्याचा फटका बसला. काही ठिकाणी तलाव सुद्धा भरून वाहू लागल्याने रस्त्यावर पाणी जमा झाले होते. तर पश्चिम पट्टीतील गावकऱ्यांचे मात्र पुरते हाल झाले. मुसळधार पावसाने वसई सह नायगाव, नालासोपारा, विरार शहराला पुन्हा एकदा मोठा फटका दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. सालाबाद प्रमाणे वसई पूर्वे कडील पूर्व- पश्चिम व वसई रोड स्टेशन ते माणिकपूर रस्ताही पूर्ण पाण्याखाली गेला होता. त्यातच काही दुकाने, बँकांच्या एटीएम सेंटरमध्ये हि पाणी शिरले होते. वसई रोड ते गोखीवरे या मुख्य रस्त्यावर एव्हरशाईन सिटी दरम्यान प्रचंड पाणी तुंबून राहिल्याने वाहतूक कोलमडून गेली होती. या रस्त्यापलिकडे असलेल्या मीठागर पाड्याला पाण्याने वेढा दिल्याने तर सनसिटी रस्ता दोन रात्रीपासून पुन्हा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गाला पावसाचा तडाखा : वाहनांच्या रांगा
गेली तीन दिवस पडणाºया पावसाच्या तडाख्याने शनिवार पासूनच मुंबई-अहमदाबाद हायवेवर काठीयावाडी ढाबा मालजीपाडा, ससूनवघर आदी महामार्गालगतच्या परिसरात पाणी तुंबून राहिले असल्याने वाहतूकीला मोठा विलंब लगत होता. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्या साठी वाहतूक पोलिसांना नवनवीन शकला लढवाव्या लागल्या पाणी वाहून जाण्यासाठी अद्याप कोणतीच उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनांचा खोळंबा होऊन वाहतूकीची तोन्ही बाजूला प्रचंड कोंडी झाली. त्यात गणेश विसर्जनाच्या मिरवणूकांचीही भर पडली होती.

लोकप्रतिनिधी,महापालिका प्रशासन आणि ट्रॅफिक पोलीस गायब : पादचारी व वाहनचालक संतप्त
ऐन वेळी मोर्चे, आंदोलन, सण- उत्सव अथवा आपला नेता आला कि गर्दी करणारे पक्षीय कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासन आणि महसूल खाते अवैध रेती वाहतूक करणारे ट्रक आणि अवजड वाहनांकडून वसूली करण्यासाठी नाक्या नाक्यावर असलेले ट्रॅफिक पोलीस या संकटाच्या काळात गायब झाले होते.
कोंडी सोडवण्यासाठी एकही पोलीस वसई विरार च्या मुख्य ठिकाणी कुठंही तैनात दिसला नाही. याउलट काही सामाजिक संघटनांच्या स्वयंसेवकांनी लोकांना मदत केली त्यामुळे नागरिकांनी व काही वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तर रस्त्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे दुचाकीधारक घसरून अपघाताच्या घटना देखील यावेळी घडल्यात.
रस्ते महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिका यांच्या कामांचा निकृष्ट दर्जा, ढिसाळ नियोजन व गैरकारभारामुळेच महामार्ग व शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यावर पाणी तुंबण्याचे प्रकार सतत वसई विरार महापालिका हद्दीत व वसई तालुक्यात होत असल्याने याबाबतचा कमालीचा संताप नागरिक व्यक्त करीत होते.

नवघर माणिकपूर शहरातील बहुतेक भागात पाणी साचले आहे आमची यंत्रणा लक्ष ठेवून आहे, तरीही कोणी अधिकारी व त्याची टीम याबाबत लक्ष देत नसेल तर मी स्वत: जातीने माहिती घेतो
-आयुक्त बी जी पवार
वसई विरार शहर महापालिका

आम्ही सर्व आपात्कालीन यंत्रणांवर नवघर स्टेशनमध्ये उभा राहून लक्ष ठेवून आहोत, आणि नागरिकांच्या तक्र ारी वजा सूचनेनुसार मी स्वत: लक्ष देऊन याठिकाणी प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतो.
- प्रवीण शेट्टी, महापौर
वसई विरार शहर महापालिका

मागील चार दिवस झाले वसईत पाऊस पडतोय, त्यानुसार नवघर माणिकपूर शहराच्या बहुतांश भागात परिस्थिती दयनीय आहे, सर्व मुख्य रस्ते पाण्याखाली गेले असतांना नागरीकांना मदत करायचे सोडून अशावेळी पालिका प्रशासन व त्यांची आपत्कालीन यंत्रणा नेमकी कुठे बेपत्ता होते, लोकांचे हाल सुरु आहेत, आपत्कालीन यंत्रणा व प्रभागात ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यांनी काय काय व कुठे मदत केली याची खरी माहिती आयुक्त बी जी पवार व महापौर शेट्टी यांनी जरूर घ्यावी.
- जगदीश भाई सोलंकी, जेष्ठ नागरिक,वसई माणिकपूर

Web Title: Wasai, Virar, Nalasopara again waterlogged!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.