नवघरमध्ये वारांगनांचा उच्छाद
By Admin | Updated: January 8, 2016 01:53 IST2016-01-08T01:53:50+5:302016-01-08T01:53:50+5:30
नवघर परिसरात वारांगनांचा सुळसुळाट झाला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉकवर त्यांचा उपद्रव वाढतो आहे.

नवघरमध्ये वारांगनांचा उच्छाद
शशी करपे,वसई
नवघर परिसरात वारांगनांचा सुळसुळाट झाला असून सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वसई रोड रेल्वे स्टेशन, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉकवर त्यांचा उपद्रव वाढतो आहे. यावर कारवाई करण्याऐवजी एसटी, रेल्वे आणि स्थानिक पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून चालढकल करीत असल्याने त्यांनाही मॅनेज केले जात असल्याचे लोक उघडपणे बोलू लागले आहेत.
नवघर-माणिकपूर शहरात अनेक लॉज आहेत. त्या लॉजमध्ये अनैतिक धंदे चालतात हे जगजाहिर आहे. मात्र, आता याठिकाणी येणाऱ्या वारांगनांनी रस्त्यावर उभे राहून गिऱ्हाईके पटवण्यास सुरुवात केली आणि गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत नेहमी गर्दीने भरलेल्या ठिकाणी वारांगनांचा जणू बाजारच भरू लागला आहे. वसई रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २, नवघर एसटी स्टँड आणि स्कायवॉक वर त्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसतो.
नवघर-माणिकपूर वसईतील सर्वांत जास्त लोकसंख्येचे शहर आहे. याठिकाणी शाळा-कॉलेज-क्लासेस खूप आहेत. नोकरीवर जाणाऱ्या महिला आणि गृहीणींची संख्या मोठी आहे. विद्यार्थींनी, कामावर जाणाऱ्या महिला आणि गृहिणींना ये-जा करण्यासाठी असलेल्या मुख्य रस्त्यावरच तीन-चारशे वारांगनांचा ठिय्या असतो. बाहेरख्यालींच्या नजरा महिलांना त्रास देतात. कधी तर या महिलांनाही विचारणा करण्यात येते. धक्कादायक बाब म्हणजे एसटी स्टँडमध्ये वीजेची पुरेशी सोय नसल्याने याठिकाणी रात्री काळोख असतो. त्याचाही फायदा घेतला जात असल्याने त्यातून मार्ग काढून ये-जा करणे महिलांना अतिशय जिकीरीचे होऊन बसते. त्यामुळे येथील महिला त्रस्त झाल्या आहेत. त्यानंतर गीता आयरे यांच्या माँ आणि श्रद्धा मोरे यांच्या स्त्री सखी महिला संघटनांनी अनेकवेळा आंदोलन करून वारांगनांना पिटाळून लावले आहे. पण, रेल्वे, एसटी आणि स्थानिक पोलीस कडक कारवाई करीत नाहीत.