तारापूर किल्ल्याचा विजय दिन जल्लोषात साजरा
By Admin | Updated: February 2, 2017 02:41 IST2017-02-02T02:41:27+5:302017-02-02T02:41:27+5:30
किल्ले वसई मोहीम परिवार व तारापूरचे ग्रामस्थ यांच्या सहभागाने जंजिरे तारापूर किल्याचा २७९ वा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

तारापूर किल्ल्याचा विजय दिन जल्लोषात साजरा
बोईसर : किल्ले वसई मोहीम परिवार व तारापूरचे ग्रामस्थ यांच्या सहभागाने जंजिरे तारापूर किल्याचा २७९ वा विजय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढून भगवे झेंडे व पेटत्या मशालीनी सुशोभित केला होता.
ग्रामस्थ व दुर्गमित्रांच्या साक्षीने किल्ल्याच्या वास्तुदेवतेचे प्रथम पूजन अॅड. गोपाळ बर्वे, दत्तात्रय चोरघे व अभिजित चोरघे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर वसई, तारापूर पालघर, डहाणू, मालाड, मुंबई या विभागातून आलेल्या १०० दुर्गमित्रांच्या साक्षीने जंजिरे तारापूरच्या किल्याच्या गौरवशाली इतिहासाला मानवंदना देण्यात आली.
इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी तारापूरचा प्राचीन इतिहास व बाजी भीवराव रेठरेकर यांच्या पराक्रमाची ओळख दुर्गमित्रांना करून देवून मराठ्यांच्या आरमारी मोहिमा व शिवकालीन युद्धतंत्र यावर मार्गदर्शन केले. तारापूर रणसंग्रामाचे औचित्य साधून समस्त दुर्गमित्र तारापूर मोहिमेच्या युद्धस्थळी एकत्र जमले होते. यावेळी तारापूर किल्ल्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गास ‘नरवीर’ बाजी भीवराव रेठरेकर समाधी मार्ग असे नामांतरण करण्यात येवून राऊत यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन करण्यात आले
बाजी भीवराव रेठरेकर या नरवीराच्या पराक्र माचा व नरवीर चिमाजी आप्पांच्या युद्धनेतृत्वाचा साक्षीदार असणारा तारापूर किल्ला संवर्धन करण्यास येत्या मार्च व एप्रिल महिन्यात महाश्रमदान मोहीम आयोजित करण्यात येणार असल्याचे दुर्गमित्रांनी जाहीर केले.
जंजिरे तारापूरच्या छोटेखानी इतिहास मार्गदर्शन पुस्तिकेच्या प्रकाशनासाठी अभ्यासक व स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन विवेक भिंगे यांनी केले. तर सिध्देश नानरकर व दीपाली पावसकर आगामी काळात दुर्गसंवर्धन मोहिमांचे नियोजने सादर करून त्या मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले . (वार्ताहार)