दोन महिला अत्यवस्थ, इतरांचा धोका टळला
By Admin | Updated: March 1, 2016 01:59 IST2016-03-01T01:59:45+5:302016-03-01T01:59:45+5:30
पाणजू दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोन महिलांची प्रकृत्ती अद्याप चिंंताजनक आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका मात्र टळला आहे

दोन महिला अत्यवस्थ, इतरांचा धोका टळला
वसई : पाणजू दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी दोन महिलांची प्रकृत्ती अद्याप चिंंताजनक आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका मात्र टळला आहे. अपघातग्रस्त बोट मालकाची चौकशी सुरु असली तरी दुर्घटनेप्रकरणी अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.
रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पाणजू येथील एका लग्नासाठी वऱ्हाड घेऊन जाण्याच्या तयारीत असलेली बोट क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले गेल्याने नायगाव खाडीकिनारी कलंडून झालेल्या अपघातात रामचंद्र म्हात्रे यांचा मृत्यू झाला होता. तर २१ जण जखमी झाले होते. यातील नूतन घरत आणि गीता पाटील यांची प्रकृती अद्याप चिंंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतरांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. एक वर्षांच्या फाल्गुनी पाटील हिच्याही प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे.
दरम्यान, अपघाताचा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्त बोट मालक दिलीप पाटील यांची चौकशी करण्यात आली. मात्र, याप्रकरणी अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, दुर्घटनाग्रस्त बोटीत बहुतांश महिला होत्या. अपघात झाल्यानंतर महिला पाण्यात आणि चिखलात पडल्याने त्यांच्या अंगावरील दागिने गायब झाले होते. आज सकाळपासून याठिकाणी दागिन्यांची शोधमोहिम हाती घेण्यात आली असता चिखल आणि पाण्यात काही प्रमाणात दागिने आढळून आले. म्हात्रे वसईतील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. रविवारी शाळेत पालकांचा क्रीडा दिवस असल्याने सकाळी ११ वाजेपर्यंत ते शाळेत होते. त्यानंतर ते पाणजू येथे लग्नास जाण्यास निघाले असता ही दुर्घटना घडली. म्हात्रे यांचे नेत्रदान करावे अशी इच्छा त्यांच्या कुटुंबियांची होती. त्यांनी वसईतील देहमुक्ती चळवळीचे प्रणेते पुरुषोत्तम पवार यांच्याकडे व्यक्त केली होती. मात्र बुडून मृत्यू झालेला असल्यास अवयव दान करता येत नाही. अशी माहिती पुरुषोत्तम पवार यांनी दिली असल्याने त्यांचे नेत्रदान करता आले नाही. त्यांचा मुलगा हर्षद म्हात्रे याची २०२० साली टोकियोत होणा-या आॅलिंपिकसाठी निवड झाली आहे. पण मुलाचें हे यश पाहता येणार नसल्याची खंत त्यांचा कुटुंबियांनी व्यक्त केली.
(प्रतिनिधी)