अंदाजपत्रकात करवाढ नाही
By Admin | Updated: February 25, 2015 22:50 IST2015-02-25T22:49:40+5:302015-02-25T22:50:34+5:30
वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून
अंदाजपत्रकात करवाढ नाही
वसई : वसई विरार शहर मनपाचा २०१५-१६ चा आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले. त्यात कोणतीही करवाढ नसून शिल्लक मात्र ३७ कोटी ५७ लाख रू. आहे. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे कर आणि दरवाढीचा बोजा सर्वसामान्य करदात्यांवर पडू नये याची काळजी घेण्यात आली आहे. एकूण २३७४ कोटी ५८ लाख रू. जमा तर २३३७ कोटी ५७ लाख खर्च दाखवण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प महासभेसमोर येणार असून त्यावर चर्चा झाल्यानंतर तो मंजूर करण्यात येणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठा व अन्य नागरीसुविधा ४१८ कोटी, दिवाबत्ती व्यवस्था २५ कोटी, स्वच्छता व साफसफाई १३९ कोटी, अग्नीशमन ३१ कोटी, बांधकाम १ हजार ७ कोटी अशा या तरतूदी आहेत. थकीत कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू करण्यात येणार आहे. ५ वर्षाचा कर एकाच वेळी भरणा केल्यास १५ टक्क्याची सवलत देण्यात येणार आहे. करवसूलीचे इष्टांक गाठता न आल्यामुळे करदात्यासाठी ही योजना अंमलात आणणार आहेत. सदर अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागितला, पण त्यास नकार देण्यात आल्यामुळे विरोधी पक्ष नेते विनायक निकम, संजय कोळी व राजन पाटील यांनी सभात्याग केला. गेल्या आर्थिक वर्षात कोणत्याही योजना अंमलात येऊ शकल्या नाहीत. या योजनांचा अर्थसंकल्पामध्ये कोणताही उल्लेख नसल्यामुळे या योजना गुंडाळण्यात आल्या का? असा प्रश्न करदात्यांना पडला आहे. डहाणू तालुक्यात सुसरी नदीवर अतिरीक्त पाणीपुरवठा योजना प्रकल्प राबवण्यासंदर्भात तसेच अन्य योजनांची सद्यस्थिती याबाबत कोणतेही आकलन त्यामुळे नगरसेवक व जनतेला होत नाही, असा आक्षेप आहे. (प्रतिनिधी)