समाधानकारक पावसामुळे भातशेती बहरली; यंदा पिकावर रोगाचे प्रमाण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:27 IST2020-08-28T00:27:41+5:302020-08-28T00:27:48+5:30

चांगले उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

Satisfactory rains brought prosperity to paddy fields; This year the incidence of disease on the crop is less | समाधानकारक पावसामुळे भातशेती बहरली; यंदा पिकावर रोगाचे प्रमाण कमी

समाधानकारक पावसामुळे भातशेती बहरली; यंदा पिकावर रोगाचे प्रमाण कमी

वाडा : गेल्या दोन महिन्यांपासून समाधानकारक व भातशेतीला उपयुक्त असा पाऊस पडत असल्याने भातशेती बहरली आहेत. या वर्षी पिकेचांगली येऊन उत्पन्न वाढण्याची आशा शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे बळीराजा आनंदला आहे. संततधार पावसामुळे आतापर्र्यंंत रोगांचे प्रमाणही कमी असल्याचे दिसून येत आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथील वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. याबरोबरच गुजरात ४, गुजरात ११, सुरती, वायएसआर, जोरदार, कर्जत ३, कर्जत ४, पूनम आदी अनेक भाताच्या वाणांची लागवड शेतकरी करीत असून उत्पादन घेत असतात. तालुक्यात सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. तालुक्यातील भातशेती ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. येथे काही भाग वगळता सिंचनाची व्यवस्था नाही. यामुळे शेतकºयांना पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

या वर्षी भात लागवड केल्यापासून ते आतापर्यंत दररोज संततधार पाऊस पडत असल्याने भाताचे पीक चांगलेच बहरले आहे. संततधार पावसामुळे या वर्षी रोगाचे प्रमाणही अत्यंत कमी असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पीक बहरले असून या वर्षी उत्पन्न चांगले येणार असल्याची आशा शेतकºयांना वाटत आहे. सर्वत्र हिरवीगार शेती पाहायला मिळत आहे. पावसाची उघडीप सुरू असल्याने भाताला पोषक वातावरण मिळत आहे. यामुळे शेतकरीही आनंदला आहे. तालुक्यात हळवे, गरवे व निमगरवे भात पीक घेतले जाते. सद्यस्थितीत हळवे भातपीक निसावायला (कणीस यायला) सुरुवात झाली आहे. पावसाने आणखी काही दिवस अशीच उघडीप दिल्यास चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकºयांमध्ये आहे.

१५ हजार हेक्टरवर भाताची लागवड
या वर्षी भातपिकाला आवश्यक असणारा पाऊस पडत असल्याने भातशेती चांगली आली आहे. सततच्या पावसामुळे भात बहरले आहे. दिवसांतून एक-दोन सरी आता येत असून त्या भातपिकाला योग्य अशाच आहेत. सततच्या पावसामुळे रोगाचे प्रमाणही कमी आहे. मात्र, यापुढे सर्व निसर्गावर अवलंबून आहे. - माधव हासे, तालुका कृषी अधिकारी, वाडा

Web Title: Satisfactory rains brought prosperity to paddy fields; This year the incidence of disease on the crop is less