श्रमजीवीच्या मोर्चापुढे प्रशासन नमले
By Admin | Updated: August 24, 2015 23:28 IST2015-08-24T23:28:24+5:302015-08-24T23:28:24+5:30
श्रमजीवी संघटना, वाडा तालुका शाखेच्या वतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी वाडा पंचायत समितीच्या कार्यालयावर शेकडो श्रमजीवींनी मोर्चा काढून तालुक्यातील

श्रमजीवीच्या मोर्चापुढे प्रशासन नमले
वाडा : श्रमजीवी संघटना, वाडा तालुका शाखेच्या वतीने सोमवारी आपल्या विविध मागण्यांसाठी वाडा पंचायत समितीच्या कार्यालयावर शेकडो श्रमजीवींनी मोर्चा काढून तालुक्यातील आरोग्य विभागाचा निषेध केला. मोर्चेकऱ्यांनी पंचायत समितीच्या इमारतीला घेराव घालून येथील मार्ग बंद केला होता. अखेर, मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांची प्रशासनाने दखल घेऊन या मागण्यांची पूर्तता केली असल्याचे लेखी पत्र आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांनी मोर्चेकऱ्यांपुढे येऊन वाचून दाखविले.
मोर्चेकऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गोऱ्हे येथील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, सफाई कामगार व इतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरित भरावीत, कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम तत्काळ पूर्ण करावे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी नेमून दिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात राहावे, कुडूस येथे रिक्त असलेले आरोग्य अधिकाऱ्याचे पद तत्काळ भरण्यात यावे, गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही, ते त्वरित मिळावे आदी मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाला दिले.
या मोर्चाचे नेतृत्व पालघर जिल्हा संघटक उल्हास भानुशाली, शेतकरी जिल्हाप्रमुख जयराम बरफ, तालुकाध्यक्ष मिलिंद धुळे, तालुका संघटक सरिता जाधव यांनी केले. या वेळी मोर्चेकऱ्यांचे एक शिष्टमंडळ तहसीलदार डॉ. संदीप चव्हाण, गटविकास अधिकारी निखिल ओसवाल, वाड्याचे सहायक पोलीस अधिकारी संजय चौधरी, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता बोरीकर, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण यांच्यात बैठक होऊन या मागण्यांची तत्काळ पूर्तता करण्यात यावी, असे लेखी पत्र देण्याचे मान्य झाल्याने संतापलेले मोर्चेकरी शांत झाले. दरम्यान, तालुक्यात आरोग्य सेवेचा बोजवारा उडविला, असा ठपका ठेवत आरोग्य अधिकारी चव्हाण यांच्यावरच कारवाई करण्यात यावी, ही मागणी मोर्चेकऱ्यांनी लावून
धरली. मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे लेखी पत्र आरोग्य अधिकाऱ्यांनी वाचून दाखविले. या वेळी तालुका उपाध्यक्षा निर्मला पाटील, सुरेश पराड, संघटक बाळाराम पाडोसा आदी उपस्थित होते. आता या मागण्या प्रत्यक्षात कधी मान्य होतात याकडे सगळ््यांचे लक्ष आहे. (वार्ताहर)