रिक्षा चालकांनी बुजवले खड्डे; अपघात वाचविण्यासाठी घेतला पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 23:22 IST2019-07-20T23:22:43+5:302019-07-20T23:22:48+5:30
पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने मोटारसायकल चालकांना अंदाज न आल्याने बऱ्याचवेळा अपघातही झाले आहेत

रिक्षा चालकांनी बुजवले खड्डे; अपघात वाचविण्यासाठी घेतला पुढाकार
कासा : प्रशासनाच्या दुर्लक्षाने जीवघेणे ठरलेले डहाणू तालुक्यातील तवा ते पेठ रस्त्यावरील खड्डे शुक्रवारी रिक्षा व जीप चालकांनी बुजविले. या ५ कि.मी. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गेल्या १० वर्षापासून या रस्त्याची दुरुस्तीच झाली नाही.
त्यामुळे पेठजवळ तर एका बाजूला पूर्ण रस्ता उखडून गेला आहे पावसाळ्यात हे खड्डे पाण्याने भरल्याने मोटारसायकल चालकांना अंदाज न आल्याने बऱ्याचवेळा अपघातही झाले आहेत. त्यामुळे येथील प्रवासी वाहतूक करणाºया वाहन चालकांनी पुढाकार घेऊन विटा, दगड, मुरूम स्वत:च्या गाडीत भरून दिवसभर खड्डे बुजविले व रस्त्याची साफसफाई केली.
यामध्ये विश्वनाथ ठाकूर, संतोष घरत, चंद्रकांत घरत, सुदाम कदम, वैभव ठाकूर, मंगेश केदार, दिलीप घरत, अंकुश पुजारा, दिलीप पालवा, शैलेश रावते, अनिकेत खडके, नरेश वरठा, रमेश गाडे हे सहभागी झाले होते.