मनपा वनजमिनीवर करणार चार लाख वृक्षांची लागवड
By Admin | Updated: May 20, 2014 01:57 IST2014-05-20T01:48:59+5:302014-05-20T01:57:51+5:30
महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरी वनीकरण व वनजमिनीवर सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे

मनपा वनजमिनीवर करणार चार लाख वृक्षांची लागवड
दीपक मोहिते , वसई - विरार शहर महानगरपालिकेतर्फे पावसाळी हंगामामध्ये महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरी वनीकरण व वनजमिनीवर सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवडीचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने यंदा पर्यावरणदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ५ जून या पर्यावरणदिनी महानगरपालिकेतर्फे सामाजिक वनीकरण कार्यक्रमाअंतर्गत ४ लाख रोपे लागवड करण्यात येणार आहेत. या दिवशी सकाळी ८ वा. महानगरपालिका मुख्यालयापासून वृक्षदिंडी काढण्यात येणार आहे. १९८० च्या दशकात वसई-विरार उपप्रदेशात नागरीकरणाला वेग येऊन बांधकाम व्यवसाय फोफावला. बांधकाम व्यावसायिकांनी बांधकामे करताना वृक्षसंपदेवर मोठ्या प्रमाणात घाला घातला. समुद्रकिनारी असलेल्या गावामध्ये बागायती मोठ्या प्रमाणात होती परंतु तिचे क्षेत्र आता कमी होत चालले आहे. उपप्रदेशाच्या पुर्व भागात अनधिकृत बांधकामांनाही वेग आल्यामुळे तुंगारेश्वर डोंगरासारखे हिरवेगार डोंगरही आता उजाड झालेले पहावयास मिळतात. वसई-विरार नालासोपारा या तीन शहराच्या पूर्वेस प्रचंड प्रमाणात वृक्षहानी झाली. हे लोण ग्रामीण भागातही पसरत गेले व उपप्रदेशात पर्यावरणाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला. महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथम महापौर राजीव पाटील यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची संकल्पना प्रशासनासमोर मांडली व ती सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामी प्रशासनाला तत्कालीन वनसंरक्षकाचेही पूर्ण सहकार्य लाभले. ५ जून २०१४ सकाळी ९ वा. जीवदानी मंदिर पायथ्याशी हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी पर्यावरण विषयावर खुली चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून पर्यावरण या विषयावर २४ बाय १८ इंच आकाराच्या ड्रॉइंग पेपरवर आपल्या कलेचे चित्र साकारण्याची संधी सहभागी होणार्या चित्रकारांना देण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रथम पारितोषिक - ५ हजार, द्वितीय पारितोषिक - ३ हजार, तृतीय पारितोषिक - २ हजार व उत्तेजनार्थ - १ हजार रू. ची दोन अशी दोन पारितोषिके देण्यात येणार आहेत. या उपक्रमात नागरिक व चित्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महापौर नारायण मानकर, माजी महापौर राजीव पाटील व महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद राठोड यांनी केले आहे. काही भागात वृक्षाची लागवड करण्यात आली व आता ही मोहिम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलली आहेत. येणार्या काळात महानगरपालिका प्रशासनातर्फे दरवर्षी लाखो रोपांची लागवड करण्याचा मानस जाहीर करण्यात आला आहे.