‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मृत्युचे गूढ वाढले
By Admin | Updated: January 16, 2016 00:22 IST2016-01-16T00:22:08+5:302016-01-16T00:22:08+5:30
रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे.

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या मृत्युचे गूढ वाढले
- शशी करपे, वसई
रविवारी रात्री विरारमधील दोन विद्यार्थ्यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाल्याची नोंद करताना दोघांच्या अपघातामधील अंतरात तब्बल ४० मिनिटांची तफावत दाखवण्यात आली आहे. भार्इंदरला दोघेही गेले असताना मृतदेह मात्र नारंगी आणि वैतरणा दरम्यान आढळून आले होते. तर दोन्ही मुले केळवा येथे गेल्याचे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा आरोप करीत मुलांच्या नातेवाईकांनी मृत्युबाबतच संशय व्यक्त केला आहे.
विरारमधील जितेन यादव (१६) आणि विकी झा (१६) हे दोन मित्र रविवारी दुपारी घराबाहेर पडले होते. विकी मित्राच्या वाढदिवसासाठी भार्इंदरला जातो सांगून घराबाहेर पडला होता. जितेन वही आणायला मित्राकडे जातो सांगून घराबाहेर पडला होता. दोघेही रात्री उशिरा घरी न परतल्याने नातेवाईकांनी शोध सुरु केला होता. रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह नारंगी आणि वैतरणा दरम्यान रेल्वे रुळावर आढळल्याचे सांगून अपघाती मृत्युची नोंद केली होती. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडे सापडलेल्या ओळखपत्रावरून दोघांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता. पोलीस डायरीत विकीचा अपघात ७ वाजून १० मिनिटाने झाल्याची तर जितेनचा ७ वाजून ५० मिनिटांनी अपघात होऊन मृत्यु झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्युचे कारण समजून येईल. दोन्ही मुलांच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जातील. तसेच त्यांच्या मित्रांची चौकशी केली जाईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.