नेत्यांच्या चमकोगिरीने मोदी अस्वस्थ
By Admin | Updated: October 6, 2014 03:56 IST2014-10-06T03:48:42+5:302014-10-06T03:56:32+5:30
औरंगाबाद आणि बीडच्या प्रचार सभा गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या सभेत मात्र अस्वस्थ असल्याचे दिसले.
_ns.jpg)
नेत्यांच्या चमकोगिरीने मोदी अस्वस्थ
मुंबई : औरंगाबाद आणि बीडच्या प्रचार सभा गाजविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या सभेत मात्र अस्वस्थ असल्याचे दिसले. भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार मोदी आल्यानंतरही भाषण करत राहिले, तसेच काही गुजराती नेते काहीबाही सांगण्यासाठी जवळ जात असल्याने ही नाराजी असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
सभेसाठी नरेंद्र मोदी यांचे व्यासपीठावर आगमन होत असताना भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांचे भाषण सुरू होते. मात्र मोदी आल्यानंतरही त्यांनी स्वत:चे भाषण सुरूच ठेवले. प्रकाश मेहता, सुनील राणे, किरीट सोमैया तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सूचना करूनही शेलार थांबले नव्हते याकडे काही कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. भाजपात प्रवेश करणाऱ्या रमेश शेंडगे यांचे मोदींनी उत्साहात स्वागत केले. मात्र त्यानंतर ते काहीसे अस्वस्थ झाल्याचे कार्यकर्त्यांना दिसून आले. व्यासपीठावरील भाजपा नेते राज पुरोहित, अमित शहा, मंगलप्रभात लोढा असे काही गुजराती नेते एकामागोमाग मोदींजवळ येत त्यांच्या कानात कुजबुज करीत असल्याचे दृश्य दिसत होते. मोदी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतानाही या नेत्यांची कुजबुज थांबत नव्हती. या प्रकाराने
मोदी नाराज झाले असावेत आणि त्यामुळेच भाषणादरम्यान ते काहीसे अस्वस्थ झाल्याचा दावा कार्यकर्ते करत आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे भाषण सुरू असताना आशिष शेलार यांनी पंतप्रधानांशेजारची खुर्ची पटकावली आणि तेही त्यांच्या कानात काहीतरी सांगू लागले. या कुजबुजीचा तपशील कळला नसला तरी मुंबईतील नेत्यांच्या अशा चमकोगिरीमुळेच मोदींना भाषणात सूर गवसायला अडचण आल्याची प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. आधीच्या दोन्ही सभांमध्ये स्थानिक विषयांवर मांड टाकून मोदींनी तुफान फटकेबाजी केली. पण मुंबईच्या सभेत तो प्रभाव दिसला नाही, असेही कार्यकर्त्यांचे मत आहे. (प्रतिनिधी)