वसई-विरारमध्ये बाजारपेठा राख्यांनी फुलल्या
By Admin | Updated: August 22, 2015 22:21 IST2015-08-22T22:21:35+5:302015-08-22T22:21:35+5:30
रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई-विरार परिसरातील बाजारपेठा विविधरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बहुतेक चाकरमान्यांना शनिवार-रविवार सुटी असल्याने

वसई-विरारमध्ये बाजारपेठा राख्यांनी फुलल्या
वसई : रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई-विरार परिसरातील बाजारपेठा विविधरंगी राख्यांनी सजल्या आहेत. बहुतेक चाकरमान्यांना शनिवार-रविवार सुटी असल्याने आज बाजारपेठांमध्ये राखीखरेदीसाठी महिला व तरुणींची मोठी गर्दी होती. यंदा आदिवासी महिलांनी बनविलेल्या बाम्बूच्या इको-फ्रेण्डली राख्या व चिनी बनावटीच्या राख्यांचे मोठे आकर्षण पाहायला मिळाले.
दरवर्षाप्रमाणे यंदाही रक्षाबंधनच्या सहा दिवस अगोदर बाजारात राख्या विक्रीला आल्या आहेत. २० ते २०० रुपयांपर्यंतच्या राख्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत. पूर्वी मिळणाऱ्या राख्यांच्या तुलनेत यंदा भाव चांगलेच वधारले आहेत.
भारतीय बाजारपेठांवर चिनी वस्तूंचे आक्रमण सुरू असताना यंदा त्यांनी वेगवेगळ्या रंगांच्या व आकारांच्या राख्या बाजारात उतरविल्या आहेत. भारतीय राख्यांच्या तुलनेत त्यांचे भावसुद्धा खिशाला परवडतील असेच असल्याने देशी उत्पादनांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे.
दूरवरच्या भाऊरायाला राखी पाठविण्यासाठी पूर्वी ताई-मार्इंची पोस्टात मोठी गर्दी पाहायला मिळायची. आता ती जागा कुरिअर कंपन्यांनी घेतलेली आहे. राखीविक्रीसंदर्भात बोलताना वसईतील अजय मेहता म्हणाले, दरवर्षी वसई-विरार उपप्रदेशात रक्षाबंधननिमित्त लाखो रुपयांची उलाढाल होत असते.
परंतु, यंदा बाजारात चिनी राख्यांचे आक्रमण झाल्यामुळे देशी राख्यांना मागणी कमी झाली आहे. तसेच पालघर जिल्ह्याच्या
ग्रामीण भागातील आदिवासी सामाजिक संस्थांनी यंदा इको-फ्रेण्डली राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांनाही बाजारात चांगली मागणी आहे.