खारघर पथकर नाक्याचा पत्ता कट?
By Admin | Updated: July 20, 2014 23:08 IST2014-07-20T23:08:12+5:302014-07-20T23:08:12+5:30
पनवेल - सायन महामार्गावरील खारघर टोलनाका सुरु होण्याच्या अगोदरच बंद करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

खारघर पथकर नाक्याचा पत्ता कट?
पनवेल : पनवेल - सायन महामार्गावरील खारघर टोलनाका सुरु होण्याच्या अगोदरच बंद करण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महामार्गाच्या रुंदीकरणाकरिता आलेल्या बाराशे कोटी रुपये खर्चाचा भार सिडकोने उचलण्याची तयारी दर्शवली आहे. तसे संकेत सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी शुक्रवारी पनवेल येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात दिले. गणपतीपूर्वी यावर धोरणात्मक निर्णय होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
मुंबई ते पुणे येथे जलद गतीने पोहचता यावे याकरिता मुंबई - पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आला. ताशी ८० कि.मी.ची मर्यादा ठरवून दिलेला हा महामार्ग कळंबोलीपासून सुरु होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असल्याचे पाहून त्यांचे रुंदीकरण करण्याचे काम दोन वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वानुसार हा महामार्ग दहा पदरी करण्यात आला असून २३ कि.मी. अंतरावर काही ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत.
या महिन्याच्या सुुरुवातीला हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असला तरी अद्याप अनेक कामे बाकी राहिलेले आहेत. असे असताना फक्त टोल वसूल करण्याची घाई म्हणून काम पूर्ण झाल्याचा आव संबंधीत ठेकेदाराने आणला. खारघर या ठिकाणी टोल नाका उभारण्याचे काम सुुरु असून या टोलनाक्याला स्थानिक आमदार या नात्याने आ. प्रशांत ठाकूर यांनी कडाडून विरोध दर्शवला. त्याचबरोबर स्थानिकांना यामधून सूट देण्यासाठी त्यांनी ११ जुलै रोजी रास्ता रोको आंदोलनसुध्दा केले. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्या दिवशी बैठक बोलवली आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वाशी टोल नाका १५ कि.मी. अंतरावर असताना खारघर येथे नियमाने पथकर वसुल करताच कशा येऊ शकतो असा सवाल माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनीही हा टोल नाका चुकीचा असल्याची कबुली दिली. संबंधीत ठेकेदाराला त्याच्या पैशाचा परतावा करुन हा महामार्ग टोलमुक्त करण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यानुसार या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. बैठकीत कामगार नेते महेंद्र घरत यांनी परतावा करण्यासाठी सिडकोवर जबाबदारी देण्याचा प्रस्ताव मांडला. याला ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनीही दुजोरा दिला.
(वार्ताहर)