बोईसरच्या पाणी नियोजनात ग्रा.पं. नापास
By Admin | Updated: May 14, 2017 22:45 IST2017-05-14T22:45:24+5:302017-05-14T22:45:24+5:30
ग्रामपंचायती कडून अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठया बरोबरच भूगर्भातील पाणीसाठा संपून कुपनलिकाही कोरडया पडल्याने बोईसरचा

बोईसरच्या पाणी नियोजनात ग्रा.पं. नापास
पंकज राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
बोईसर : ग्रामपंचायती कडून अनियमित, अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणी पुरवठया बरोबरच भूगर्भातील पाणीसाठा संपून कुपनलिकाही कोरडया पडल्याने बोईसरचा बहुसंख्य भाग तीव्र पाणी टंचाईच्या विळख्यात सापडला आहे. नागरिकांना नाईलाजास्तव टँकरचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. पाण्याचे नियोजन करण्यात ग्रामपंचायत प्रशासन पुरते नापास झाल्याची स्थिती आहे.
पाणीपुरवठयाची भीषण समस्या साईबाबा नगर, केशवनगर, साईलिला कॉम्प्लेक्स, रमणीय पार्क, लक्ष्मण कॉम्प्लेक्स, अवधुतनगर, परमाणु नगर, मेमन कॉलोनी, खोदाराम, वर्धमान नगर, दत्तात्रेय नगर , भय्यापाडा आदी भागातील बहुसंख्य इमारतींमध्ये पाणी टंचाईची झळ प्रकर्षाने जानवत आहे.
अनेक इमारतीतील कुंपनलिका कोरड्या पडल्यावर त्या ठिकाणी नव्याने दोनशे ते तिनशे फूटापर्यंत खोल कुपनलिका खणुनही थेंबभरही पाणी लागत नसल्याने खर्चही वाया गेला आहे. तर काही इमारतींमध्ये दोन तीन वेळा कुपनलिका खणण्यात येवूनही पाणी न लागल्याने सोसायट्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
एका बाजूला ग्रामपंचयती कडून होणारा अपुरा पाणी पुरवठा तर दुसऱ्या बाजूला कोरडया पडलेल्या कुपनलिका अशा दुहेरी संकटात बोईसरचे नागरिक सापडले आहेत. त्यातच शहरात टॅँकरचा धंदा तेजीत असून प्रत्येक फेरीला ५०० ते ७०० रुपयांचा खर्च सहन करावा लागत आहे. काही नागरिकांना महागडया २० लीटर जारच्या पाण्यावर तहान भागवावी लागते.
इमारतीमध्ये स्टोअरेज टँक असल्यामुळे टँकरचे पाणी साठवून ठेवू शकतात. परंतु चाळींमध्ये ती सुविधा नसल्याने पाणी कुठे व कश्या पध्द्तीने साठवायचा ही विवंचना आहे. नागरिकांना शक्य आहे ते विकत घेऊन तहान भागवितात म्हात्र गोरगरीबांना महागडे पाणी विकत घेणे शक्य नसल्याने त्यांच्या घशाला तीव्र उन्हात सुद्धा कोरड सहन करावी लागत आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसरच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने दिवसेंदिवस पाण्याची भीषण समस्या जाणवत आहे. तर सध्या बोईसर परिसरातील काही नागरी वस्तीत सलग काही दिवस ग्रामपंचायतीच्या पाण्याचा थेंबही येत नाही. यातून मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार बोईसरची लोकसंख्या ५६ हजार ४९१ असली तरी खरी लोकसंख्या सद्या सुमारे दीड लाखांच्या वर गेली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्ये करीता एमआयडीसीकडून प्रतिदिन अवघा ४१ लाख ६० हजार लीटरचा कोटा मंजुर असून त्या पेक्षा किती तरी अधिक पटिने पाण्याची गरज आहे. एमआयडीसीकडून अपुरा आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठयामुळे बोइसरच्या सर्व भागात पाणी पुरवठा करताना ग्रामपंचयतिला अक्षरश: कसरत करावी लागत आहे
पाणी टंचाई ची तीव्रता कमी व्हावी या करीता बोईसर ग्रामपंचायतीने विविध नागरी वसाहती मध्ये मागील महिन्यांत एकूण १८ कुपनलिका नव्याने खणल्या तर केशव नगरला एक लाख लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यास सुरु केली आहे. तर भय्यापाडा येथील
एमआयडीसीकडून येणारे कनेक्शन बदलण्यात येत असल्याने काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता ग्रामपंचययतीकडून वर्तविण्यात येत आहे. पाणीटंचाईची हीच परिस्थिती कायम राहू नये म्हणून एमआयडीसीकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा कोटा वाढवून घेणे गरजेचे आहे. तसेच पाणी साठविण्यासाठी ठिकठिकाणी मोठे व पुरेसे जलकुंभ उभारुन पाणी पुरवठयातिल तांत्रिक अडचणी शोधून काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. तर राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार एम आय डी सी ने ४० टक्के पाणी कपात सुरु केल्याने त्यामध्ये अधिक भर पडली आहे. तर मंजूर कोट्या पेक्षा जास्त पाणी वापराचा दंडनीय आकार व विलम्ब शुल्कामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी बिला च्या थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. तर नियमित आणि पुरेसा पाणीच मिळत नसल्याने पाण्याचे बील भरण्यास ग्रामस्थ असमर्थता दर्शवितात. त्यामुळे ग्रामस्थानकडूनही पाणी बिलाची थकबाकी वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याने ग्रामपंचायत दुहेरी संकटात सापडली आहे.
एमआयडीसीच्या पाणीपुरवठा विभागाकडून पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही ही एकच ओरड ग्रामस्थाना नेहमी ऐकावी लागते परंतु पाणी पुरवठयातिल तांत्रिक अडचणी व दोष शोधून कोढण्याचा प्रयत्न न करता लोकप्रतिनिधींनी तसेच राजकीय पक्षाचे पुढारी आणि पदधिकाऱ्यांनी गांभीर्याने विचार न केल्याने बोईसर शहरावर पाणीबाणीची वेळ आली आहे.