पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

By Admin | Updated: August 24, 2015 23:19 IST2015-08-24T23:19:16+5:302015-08-24T23:19:16+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील

The focus of the Guardian Minister is on only four talukas | पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

पालकमंत्र्यांचे लक्ष फक्त चार तालुक्यांवर

- हितेन नाईक,  पालघर
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील सर्व रस्ते उखडले असून गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी त्यांची डागडुजी करणे आवश्यक असताना पालकमंत्र्यांनी फक्त त्यांच्या मतदारसंघातील चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ७० लाख २९ हजारांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे पालघरसह अन्य तीन तालुक्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली असून या दुजाभावामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पालघर हे जिल्ह्याचे ठिकाण असून या तालुक्यामध्ये सर्वात जास्त रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतात. यातील सर्व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. डहाणू, तलासरी, वसई तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा हे चार तालुके पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघात येतात. या चार तालुक्यांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिला असून उर्वरित पालघर, डहाणू तलासरी, वसई या तालुक्यांना निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विक्रमगड तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४७ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
वाडा तालुक्यातील सहा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४२ लाख २० हजार रुपयांचा निधी देण्यात
आला असून जव्हार तालुक्यातील सात रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ४१ लाख १९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहे. तर, मोखाडा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३९ लाख रुपयांचा निधी पालकमंत्र्यांनी मंजूर करून घेतला आहे.
डहाणूची आमदारकी धनारेंच्या रुपाने भाजपाकडे असूनही या तालुक्याची उपेक्षा झाली आहे.

हे आहे वास्तव...
पालघर तालुक्यातील पारगावनाका ते सोनावे, दारशेत, सफाळा ते घाटीम, मासवण ते नागझरी, धुकटणफाटा ते बहडोली, दहिसर, एडवण, कोरे, रातिवरे, आगारवाडी ते निघरे, नवापूर ते मुरसे, बोईसर ते शिगाव, सेटेगाव ते माकडचोळा, नागझरी ते नानिवली, आदिवासी स्टॉप ते गिरनोली आदी रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एकही रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. तसेच वसई, डहाणू, तलासरी तालुक्यांतील रस्त्यांचीही अशीच बिकट अवस्था असून त्या तालुक्यांच्या तोंडालाही पाने पुसण्यात आली आहे.

Web Title: The focus of the Guardian Minister is on only four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.