पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 06:11 AM2018-02-03T06:11:17+5:302018-02-03T06:11:46+5:30

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत.

The focus of the elections on the by-polls, the BJP's focus | पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

पोटनिवडणुकीचे पडघम, भाजपाच्या व्यूहरचनेवर लक्ष

Next

- हुसेन मेमन
जव्हार  - पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अ‍ॅड चिंतामण वणगा यांच्या आकस्मिक निधनाने पालघर लोकसभेची सारी समिकरणेच बदलली असून अवघ्या काही महीन्यांसाठी का होईना येथे पोटनिवडणुक होण्याची चिन्हे दिसत आहेत. यामुळे उघडपणे नसले तरी सर्वच पक्षांच्या अंतर्गत हालचालीना वेग आला असून भाजपा नेमकी कुणाला उमेदवारी देणार यावरूनच सर्व पक्षांच्या भूमिका ठरणार असल्याचे वृत्त आहे.
२०१४ च्या पालघर लोकसभेच्या निवडणूकीत दिवंगत वणगा यांनी २ लाख ३९ हजार मतांनी विरोधकाना धुळ चारली होती. हा कार्यकाल संपायला १५ महीन्याचा कालावधी उरला असताना त्यांच्या निधनाने रीक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. विशेषत: ही निवडणूक कॉंग्रेसने गांभिर्याने घेतली असून इतर पक्षांचे मात्र खल सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेची भूमिका भाजपचा उमेदवार कोण असेल यावर ठरणार असल्याचे कळते आहे. कारण जर वणगांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यास सेना निवडणूक लढवणार नाही अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच जिल्ह्यातील राजकारणात अल्पावधीमध्ये प्रभावी राजकीय पक्ष ठरलेला बहुजन विकास आघाडीची भूमिका सुद्धा कलटणी देणारी ठरणार आहे.
मुळात गोंदीया येथील खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेली लोकसभेची जागा आणि पालघर लोकसभा पोटनिवडणूक एकाच वेळी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक भाजप आणि कॉंग्रेससाठी अतिशय महत्वाची ठरणारी आहे. अगदी कमी कालावधीसाठी जरी ही पोटनिवडणुक होणार असली तरी पालघर हा भाजपाचाच बालेकिल्ला असून मोदी लाट देशात कायम आहे. हे भाजपाला या निवडणुकीच्या निमित्ताने दाखवून द्यायचे आहे तर भाजपाची लाट ओसरत असून ही जागा आपल्या पदरात ओढून देशात कॉंग्रेसचे पुनरागमन होत आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेसला दाखविण्याची संधी असणार आहे.
तसेच या पोटनिवडणुकीच्या निकालाचा मोठा परीणाम राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूकीवरही होणार आहे. यामुळे भाजपावर मोठा दबाव आहे.

काँग्रेस निवडणुका सिरीयसली घेणार

काँग्रेसने ही निवडणूक सिरीयसली घेतली असून नुकतेच राजस्थान मधील पोटनिवडणुकीच्या विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. याशिवाय भाजप विरोधी पक्षही एकवटलेले आहेत आमच्याकडे अनेक उमेदवारही या लोकसभेसाठी तयार आहेत फक्त उमेदवार निश्चिती बाकी आहे.
- केदार काळे,
जिल्हाध्यक्ष, काँगेस पालघर



अजून आमची याबाबत बैठक झाली नसून काहीही ठरलेले नाही. पण कमी कालावधीसाठीची ही निवडणूक लढवायची किंवा नाही यासाठी सर्व पक्षीय निर्णय सुद्धा घेता येईल तस आम्ही ठरवू. जिल्ह्याच्या विकासासाठी चांगला निर्णय झाला तर तसं अन्यथा लढवायची ठरली तर लढवलीही जाईल.
- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष,
बहुजन विकास आघाडी


अद्याप याबाबत आदेश आलेला नसला तरी आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबच याबाबत निर्णय घेतील आणि तो आम्हाला मान्य राहील.
- राजेश शहा, जिल्हा प्रमुख, शिवसेना पालघर

आमच्या पक्षाची बैठक असून त्यामध्ये याबाबत आमची भूमिका निश्चित होईल. आमची कमिटी जो निर्णय घेइल तो आम्हाला मान्य राहील.
- रतन बुधर,
राज्य कमिटी सदस्य,माकपा

कॉंग्रेस सोबत आमची आघाडी असताना ही जागा कॉंग्रेसकडे होती. तसेच सध्या वरीष्ठ पातळीवरु न आघाडीचे संकेत मिळत असल्याने तसे झाल्यास आम्ही कॉंग्रेस सोबत जावू. मात्र पालघर लोकसभा पोटनिवडणुकी बाबत आमचे वरीष्ठच निर्णय घेतील.
- सुनील भुसारा,जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी

ही लोकसभेची जागा आमचीच होती. राज्यातील पोटनिवडणुकीचे आजवरचे चित्र पाहता जिथे सेना लढली तिथे आम्ही त्यांना पाठींबा दिला. पालघर विधानसभेतही तेच झाले यामुळे आता लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेना आमच्या बरोबर राहील असे दिसते.
- बाबजी काठोळे, प्रदेश सदस्य, भाजप

Web Title: The focus of the elections on the by-polls, the BJP's focus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.