शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत - सवरा

By Admin | Updated: April 24, 2016 02:04 IST2016-04-24T02:04:25+5:302016-04-24T02:04:25+5:30

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग

Farmers should make new experiments - Sawra | शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत - सवरा

शेतकऱ्यांनी नवे प्रयोग करावेत - सवरा

वाडा : पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्यामुळे त्यांनी चांगल्या उत्पादनासाठी व आपला आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शेतीमध्ये वेगवेगळे नावीन्यपूर्ण प्रयोग करावेत. असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.
दि. १४ ते २४ एप्रिल २०१६ या कालावधीत ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियान जिल्हयामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत वाडा तालुक्यातील सांगे या गावात गुरुवारी ग्राम किसान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता बहुपीक घेण्याची मानसिकता ठेवली पाहिजे तसेच नवे तंत्र आणि मंत्र याचा वापर केला पाहिजे. असे सांगून पालघर जिल्हयाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. जिल्ह्यातील रस्ते, पूल,बंधारे, शेततळे यांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. वसई - झाई समुद्र किनारा विकसीत करण्याचे नियोजन असून त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल व रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.
या कार्यक्रमात कृषीभूषण अनिल पाटील, आशाबाई पाटील, नारायण ठाकरे, प्रीती ठाकर,अजय भदाणे यांना उत्कृष्ट आंबा निर्यातीबद्दल प्रमाणपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच या कार्यक्रमात विष्णू पष्टे, रोहिदास गायकर, कान्हा हरड, अरूण पष्टे, लडकू गायकर, गुलाब भादे, अश्विनी पाटील, बबन शेलार दया कुवरा यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पॉवर टिलर वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किसान ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या सभांमधून गावकऱ्यांना ग्राम आणि कृषी विकासाच्या योजनांची माहिती तर देण्यात येणार आहे. (वार्ताहर)

प्रभातफेरी, स्वच्छता मोहिम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी गावांमध्ये वातावरण निर्मिती केली जाईल. ग्रामसभेत राष्ट्रीय पंचायत राज दिवसाच्या निमित्ताने उपस्थितांकडून शपथ घेण्यात येईल. २४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता पंतप्रधानांचे भाषण दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वरून प्रसारित केले जाणार आहे. ते ही सर्वांनी ऐकावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी केले आहे. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. जी. पाटील, तालुका कृषी अधिकारी वारे, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers should make new experiments - Sawra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.