वसई-विरार : वसई-विरार महापालिका निवडणुकीच्या निकालात ‘बविआ’ने मिळवलेल्या एकहाती सत्तेमुळे हा निकाल राज्यात महत्त्वाचा ठरला. राज्यात मोठा पक्ष ठरलेल्या आणि बहुतांश महापालिकांत सत्ता मिळवलेल्या भाजपला वसई-विरार महापालिकेमध्ये मात्र तीन आमदार असूनही सत्ता मिळवता आली नाही. परंतु, ‘बविआ’च्या विजयाचा गुलाल धूसर होण्याआधीच वसईच्या राजकारणात ‘ऑपरेशन लोट्स’च्या हालचालींनी खळबळ उडवून दिली आहे.
वसई-विरार महापालिका निवडणूक ११५ जागांसाठी झाली. बहुमतासाठी आवश्यक असलेला ५८ चा आकडा ओलांडून ‘बविआ’ने ७१ जागांवर विजय मिळवला खरा; पण भाजप आता पडद्याआड मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहे. भाजपला ४४ जागा मिळालेल्या असल्या तरी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ४४ जागांवरून थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष रणनीती आखत आहे. ‘बविआ’चे १५ ते १६ नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. तांत्रिकदृष्ट्या हे उमेदवार अपक्ष म्हणून निवडून आल्याचे सांगितले जात असल्याने, पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात न अडकता आपला स्वतंत्र गट स्थापन करून भाजपमध्ये विलीन होण्याचा यांचा मानस असल्याचे कळते.
हितेंद्र ठाकूर यांच्या वर्चस्वाला आव्हान
गेली अनेक दशके वसई-विरारवर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हे मोठे आव्हान मानले जात आहे.‘बविआ’चा बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी ठाकूर आता काय पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे, भाजपने जर हे ऑपरेशन यशस्वी केले, तर वसई- विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुलताना दिसेल.
Web Summary : Despite BVA's victory in Vasai-Virar, BJP plans to challenge their rule. BJP aims to win over BVA corporators to gain power, challenging Hitendra Thakur's dominance.
Web Summary : वसई-विरार में बीवीए की जीत के बावजूद, भाजपा उनकी सत्ता को चुनौती देने की योजना बना रही है। भाजपा का लक्ष्य बीवीए पार्षदों को जीतकर सत्ता हासिल करना, हितेंद्र ठाकुर के प्रभुत्व को चुनौती देना है।