वाहनचालकाचा मृत्यू, जनावरेही दगावली
By Admin | Updated: March 5, 2016 01:12 IST2016-03-05T01:12:56+5:302016-03-05T01:12:56+5:30
येथील परिसरात रात्रभर वीज, वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एका वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाला, तर वीज पडून एक गाय जागीच ठार झाली

वाहनचालकाचा मृत्यू, जनावरेही दगावली
मनोर : येथील परिसरात रात्रभर वीज, वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे एका वाहनचालकाचा अपघाती मृत्यू झाला, तर वीज पडून एक गाय जागीच ठार झाली, तर दुसरा बैल बेशुद्धावस्थेत तसाच पडून आहे. वादळामुळे घराचे छप्पर उडून भिंत कोसळण्याने घरमालक जखमी झाल्याची घटना घडली. शेतकऱ्यांसह अनेकांचे अतोनात नुकसान झाल्याने सर्वांची तारांबळ उडाली आहे.
गुरुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून अचानक वादळी वारा सुटला. त्यानंतर, मुसळधार पावसाने सुरुवात केली. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिल्हार गावाजवळ नादुरुस्त उभ्या असलेल्या वाहनाला धडक दिल्याने सुनील उत्तम सिंग (२१), रा. जम्मू-काश्मीर हा जागीच ठार झाला. दुसऱ्या घटनेत वाडाखडखोना येथे वीज पडून मिठ्या हडळ आदिवासी शेतकऱ्याची गाय जागीच ठार झाली. राजाराम भिवल्या याचा बैल बेशुद्धावस्थेत पडला आहे तसेच जाधवपाडा, किराट येथे वादळी वाऱ्याने घराचे पत्रे उडून भिंत कोसळल्याने काशिनाथ कृष्णा जाधव (५५) यास गंभीर दुखापत झाली आहे. पत्नी मंजू, मुलगा अजय, मुलगी सपना, साधना व प्रतीक्षा हे वाचले.
अवकाळी वादळी पावसामुळे केव, सिलशेत, नालशेत, अपटीवाडा, विक्रमगड, जव्हार तालुक्यांतील अनेक गावांत शेतकऱ्यांनी वाळत टाकलेल्या तूळ, उडीत, वाळ, कडधान्य तसेच पावळी गवत ओलेचिंब झाले आहे. तसेच वीटभट्टी कारखान्यात कच्च्या विटा भिजल्याने त्यांचीही मोठी कुचंबणा झाली आहे. सध्या आर्थिक मंदी असून त्यातच निसर्गानेही आपले निसर्गमय वातावरण दाखवल्याने सर्वत्र लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनोर पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास मारोती पाटील सहा. पो.नि. करीत आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती झाल्याचे पंचनामे मंडळ अधिकारी नसटे व तलाठीवर्ग करीत आहेत. (वार्ताहर)