भाजप सरकारविरोधात कॉँग्रेसचा निषेध मोर्चा
By Admin | Updated: August 22, 2015 22:17 IST2015-08-22T22:17:04+5:302015-08-22T22:17:04+5:30
रेशनिंगवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांना सरकारने पुरते नाडले असून ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेतच विरले आहे. धान्य वितरण व्यवस्थेतील

भाजप सरकारविरोधात कॉँग्रेसचा निषेध मोर्चा
पालघर :रेशनिंगवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर अवलंबून असणाऱ्या गोरगरिबांना सरकारने पुरते नाडले असून ‘अच्छे दिन’चे आश्वासन हवेतच विरले आहे. धान्य वितरण व्यवस्थेतील गोंधळ थांबत नसून रेशनच्या धान्यसाठ्याची सर्रास काळ्याबाजारात विक्री केली जात असल्याची अनेक उदाहरणे पालघर जिल्ह्यात घडत असतांना प्रशासन गांधारी झाले आहे. असा आरोप करून गरिबांचा घास हिरावून घेणाऱ्या भाजपा सरकारचा आम्ही निषेध करीत असल्याचे माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित यांनी शुक्रवारी पालघरमध्ये काढलेल्या मोर्चात सांगितले.
सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पालघर तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या नेतृत्वाखाली पालघर रेल्वे स्टेशनवरून निघालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी अडवला. या वेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष मनीष गणोरे, प्रदेश सचिव केदार काळे, महिला संघटक संगीता धोंडे, तालुकाध्यक्ष सिकंदर शेख, माजी नगराध्यक्ष मनोहर दांडेकर, भावानंद संखे, इ.सह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारविरोधी घोषणा दिल्या. या वेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनात रेशनिंग कार्डांचे त्वरित वितरण करण्यात यावे. एपीएल, बीपीएल, धान्य वितरण व्यवस्थेतील अनियमितता दूर करून धान्यपुरवठा सुरळीत करण्यात यावा. एपीएलधारकांच्या धान्यसाठ्यात वाढ करावी. रेशन धान्यवाटपात काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा मागण्या करण्यात आल्या. (वार्ताहर)