सरकारविरोधात कम्युनिस्टांचा मोर्चा
By Admin | Updated: May 9, 2017 00:15 IST2017-05-09T00:15:36+5:302017-05-09T00:15:36+5:30
कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, प्रा.कलबुर्गी यांची हत्या होऊन अनेक महिने उलटले तरी आरोपींना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही.

सरकारविरोधात कम्युनिस्टांचा मोर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
विक्रमगड : कॉ.गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, प्रा.कलबुर्गी यांची हत्या होऊन अनेक महिने उलटले तरी आरोपींना पकडण्यात सरकारला यश आलेले नाही. तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते पुणे जिल्हा सचिव कॉ. अजित अभ्यंकर यांच्यावर पार्सल बॉंम्ब पाठविणाऱ्यांना अटक करा. या मागण्यांसाठी व केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मोर्चा काढला होता. जिल्हा कमिटी मेंबर कॉ. राजा गहला, कॉ. अमृत भावर, कॉ.ताई बेदर, विक्र मगड तालुका सचिव कॉ. किरण गहला, कामगार नेता कॉ. विनोद निकुळे, शेतकरी नेते कॉ. चंद्रकांत गोरखना यांनी त्याचे नेतृत्व केले होते.
यावेळी विक्र मगड तालुका सचिव कॉ. किरण गहला यांनी सांगितले की, देशात आणि राज्यात जर खरोखर लोकशाही असेल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी साकारलेल्या घटनेचे पालन करायचे असेल तर आमच्या मागण्या मान्य करा.
विक्र मगड तालुक्यातील डोल्हारी खुर्दमध्ये काही दिवसापूर्वी अंगणवाडी कार्यकर्तीची निवड मतदान पद्धतीने पार पडली. निवडून आलेल्याचासत्कार करून घोषित केले. तरीसुद्धा सत्तेत असलेल्या भाजपच्या सरपंचानी ठराव मंजूर करण्यासाठी चालढकल चालविली आहे. मग लोकशाही आहे तरी कुठे. असा सवाल त्यांनी केला.
बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना व लोकशाही मोडीत काढण्याचे षडयंत्र भाजप प्रणित सरकार करीत असून सामाजिक चळवळी करणाऱ्या नेत्यांची हत्या केली जाते, काही नेत्यांच्या हत्येचा प्रयंत्न केला जातो मात्र आरोपी अजूनही मोकाट फिरत असून त्यांना अटक करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काहीच करीत नसल्याने या सरकारचा जाहीर निषेध प्रत्येक लोकशाहीप्रेमी नागरिकाने केला पाहिजे.