बहाडोलीच्या जांभूळ उत्पादकांना फटका
By Admin | Updated: May 9, 2017 00:19 IST2017-05-09T00:19:36+5:302017-05-09T00:19:36+5:30
वसई पालघरच्याच नव्हे तर मुंबई गुजरातेपर्यंतच्या खवैय्यांना भुरळ पडणाऱ्या पालघर तालुक्यातील बहाडोलीच्या सुप्रसिद्ध जांभळांना

बहाडोलीच्या जांभूळ उत्पादकांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर/नंडोरे : वसई पालघरच्याच नव्हे तर मुंबई गुजरातेपर्यंतच्या खवैय्यांना भुरळ पडणाऱ्या पालघर तालुक्यातील बहाडोलीच्या सुप्रसिद्ध जांभळांना बहर आला असला तरी इतर ठिकाणच्या स्वस्त जांभळांमुळे त्यांचा दर यंदा दुपटीने घसरला असून त्यांचा मोठा फटका जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.
येथील शेतकरी येथील जांभळे बाजारपेठांमध्ये नेत आहेत .मात्र इतर ठिकाणांहून येणारी जांभळे कमी भावात उपलब्ध असल्याने बहाडोलीच्या जांभळाचा भाव गडाडला आहे. ऐन बहरात उत्पन्नाचे साधन असलेल्या येथील शेतकऱ्यांना यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागणार असल्याने येथील जांभूळ उत्पादक हवालदिल झाले आहेत.
एकट्या बहाडोलीत जांभळाची सुमारे दोन हजार झाडे आहेत. त्यांना मे च्या दरम्यान बहर येतो . झाडावरील जांभळांची येथील शेतकरी विविध पद्धतीने तोडणी करतात व त्यानंतर करंडा पद्धतीने ती बाजारपेठेत किंवा व्यापारी वर्गाला विक्री करतात . यावेळच्या जांभळाच्या हंगामात बाजारपेठेत त्याला तेवढा रास्त मिळालेला दिसून येत नाही.
गतवर्षी प्रति करंड्याला ५०० ते ६०० रु पये इतका भाव होता मात्र यावर्षी तो घसरून २५० ते ३०० करंडा एवढाच आहे यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकर्यांना करंड्यामागे तब्बल ३०० रु पये म्हणजे निम्मे नुकसान सोसावे लागत आहे असे या भागात सुमारे १०० उत्पादक शेतकरी असून त्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. यंदा उत्पादन चांगले पण भाव नाही, अशी अवस्था आहे.