मुंबई-वडोदरा रस्त्याच्या बैठकीवर बहिष्कार
By Admin | Updated: May 20, 2017 04:56 IST2017-05-20T04:56:38+5:302017-05-20T04:56:38+5:30
मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर

मुंबई-वडोदरा रस्त्याच्या बैठकीवर बहिष्कार
- लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता सक्षम अधिकारी तथा वाड्याचे उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात विविध खात्याचे प्रमुख व बाधित शेतकरी यांची बैठक बोलावली होती. मात्र खुद्द सक्षम अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकून आपला संताप व्यक्त केला.
ठाणे व पालघर जिल्हयÞातील आठ तालुक्यातून मुंबई- वडोदरा व्हाया पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग जात असून यात शेकडो शेतकरी बाधित होणार आहेत. वाडा तालुक्यातील केळठण, गोराड व निंबवली या तीन गावाच्या हद्दीतून हा महामार्ग जात असून यात अनेक शेतकरी बाधित होणार आहेत. तसेच निंबवली येथील ३० घरे, गोराड चार व केळठण ६ अशी घरेही महामार्गात जात असून अनेक जण त्यात बेघर होणार आहेत. याशिवाय बाजारहाट, दवाखाना, शाळा व कामधंद्यानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्यांचा मार्गही बंद होणार आहे. निंबवली येथे दोन विहिरी, पाच कूपनलिका दोन तलाव व पाणी पुरवठा योजनाही या मार्गाने बाधित होणार आहेत. तसेच शेतकऱ्यांची सुपिक जमीन जाणार असल्याने शेतकरी देशोधडीला लागणार आहे. गरम पाण्याचे झरे या महामार्गात जात असून पाण्याचे प्रवाह बंद होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. या महामार्गा संदर्भात चर्चा करण्यासाठी व जमीन मोजणीचा कार्यक्रम निश्चित करण्यासाठी प्रकल्पाचे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांनी आपल्या कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता शेतकऱ्यांसह तालुक्यातील विविध खात्याच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा हा मार्ग आम्हाला नको आहे अशी स्पष्ट भूमिका शेतकरी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा भोईर यांनी यावेळी मांडली.
शेतकऱ्यांची भूमिका ठाम
सक्षम अधिकारी आज भिवंडी निवडणूकीच्या कामात व्यस्त असल्याने उपस्थित नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याचे टाळले.
मुंबई वडोदरा प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी शिवाजीराव पवार यांनी अनौपचारिक चर्चा करण्याचे सांगितल. शेतकऱ्यांनी त्याच्यावर प्रश्नांचा भडिमार करून बहिष्कार घालण्याबाबत ठाम राहिले. त्यामुळे उपस्थित अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले.