मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 00:42 IST2020-10-12T00:42:44+5:302020-10-12T00:42:54+5:30

निधी मिळाला नसल्याचे कारण, यामुळे प्रत्येक गावातील पाड्यांची संख्या लक्षात घेता एक तरी नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Bodies cremated on riverine rocks; The condition of all four cemeteries ten years ago | मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था

मृतदेहांवर नदीकिनारी खडकावर अंत्यसंस्कार; दहा वर्षांपूर्वीच्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था

कासा : डहाणू तालुक्यातील तवा ग्रामपंचायतमध्ये तवा, कोल्हान, धामटणे, पेठ या चार महसूल गावांचा समावेश होत असून त्यांची लोकसंख्या चार हजारहून जास्त असून सुमारे २५ पाड्यांचा समावेश होतो. मात्र येथील प्रत्येक गावात एक अशा १० वर्षांपूर्वी बांधलेल्या चारही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना बाहेर नदीकाठी अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

तवा ग्रामपंचायत हद्दीतील तवा, कोल्हाण, पेठ, धामटणे या चारही गावांतील स्मशानभूमीचे पत्रे उडून दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी करण्यापेक्षा नदीकाठी खडकावर पार पाडावे लागत आहेत. तवा ग्रामपंचायतीने स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी व नवीन स्मशानभूमी बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र अद्याप निधी प्राप्त झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
२००९-१० दरम्यान तवा ग्रामपंचायतीच्या चार गावांसाठी तवा, कोल्हाण, पेठ, धामटणे येथे स्मशानभूमी बांधण्यात आलेल्या आहेत, मात्र वादळवाऱ्यामुळे स्मशानभूमीचे छप्पर उडाल्याने दुरवस्था झाली आहे. यामुळे प्रत्येक गावातील पाड्यांची संख्या लक्षात घेता एक तरी नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

‘गिरीजमधील हिंदू स्मशानभूमी शेडची दुरुस्ती करा!’
विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाच्या हद्दीतील प्रभाग समिती ‘आय’ मधील गिरीज चौधरीवाडी येथील हिंदू स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती करण्याबाबत बहुजन विकास आघाडीचे ग्रामीण युवाध्यक्ष आशीष राऊत यांनी प्रभाग समितीकडे एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यविधीवेळी येथील नागरिकांना खूप त्रास सोसावा लागतो. रात्रीच्या वेळीस अंत्यविधी वेळी येथील वीज चालू होत नसल्याने नागरिकांना अंधारात विधी उरकावा लागतो. स्मशानात पाण्याची व्यवस्था नसल्याने महापालिकेने पाण्याची टाकी बसविण्याची मागणी या निवेदनाद्वारे युवाध्यक्ष आशीष राऊत यांनी प्रभारी सहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.

तवा ग्रामपंचायतीच्या चारही स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी जनसुविधा विकास निधीसाठी एक वर्षापूर्वी प्रस्ताव सादर केला आहे. परंतु हा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. २०२०-२१ साठी जनसुविधा निधी देण्याचे मान्य केले आहे. - लतिका लहू बालशी, सरपंच, तवा ग्रामपंचायत

Web Title: Bodies cremated on riverine rocks; The condition of all four cemeteries ten years ago