एडवण शाळेला पालकांचे टाळे
By Admin | Updated: August 21, 2015 02:13 IST2015-08-21T02:13:56+5:302015-08-21T02:13:56+5:30
एडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर

एडवण शाळेला पालकांचे टाळे
हितेन नाईक, पालघर
एडवणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्षभरापासून शिक्षकांची पदे भरली जात नसल्याने शिक्षणावर विपरीत परिणाम होत होता. अनेक वेळा निवेदने, तक्रारी करूनही पालघर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून उपाययोजना आखल्या जात नसल्याने उद्विग्न झालेल्या शेकडो पालकांनी गुरुवारी शाळेला टाळे ठोकून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. एडवण प्रकरणी उद्या तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना केल्या जातील, असे पालघर पंचायत समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पालघर पंचायत समितीमधील शिक्षण विभागाचा अनेक वर्षांपासून सावळागोंधळ सुरू आहे. जिल्हानिर्मितीनंतर जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी अशी सक्षम यंत्रणा पालघरमध्ये येऊनही शिक्षक बदलीमधील घोटाळा थांबताना दिसत नाही. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमध्ये पहिली ते सातवी इयत्तेमध्ये १९५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पटाच्या निकषाप्रमाणे शाळेत एक मुख्याध्यापक, दोन पदवीधर शिक्षक व चार उपशिक्षक असणे अत्यावश्यक असताना एक निवृत्त मुख्याध्यापक असून शाळेत फक्त चारच शिक्षक कार्यरत आहेत. त्यातच एखाद्या शाळेत शिक्षकांची कमतरता भासल्यास एडवण शाळेतून शिक्षक पाठविला जात असल्याने अनेक वेळा विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. शालेय व्यवस्थापन समितीने वारंवार लेखी निवेदने देऊनही याबाबत उपाययोजना आखल्या जात नाहीत. किनारपट्टीवरील १५ ते २० शाळांची अवस्था सध्या बिकट असून पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक पालकांनी मुलांना खाजगी शाळांमध्ये दाखल केले आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. अनेक तक्रारीनंतरही मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहत असलेल्या पालकांनी शेवटी एकत्र येत शाळेला टाळे
ठोकून ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला.
पालघर शहराजवळील पूर्व भागातील नवली, वेवूर, लोकमान्यनगर तर बोईसरजवळील शिगाव, दांडी, मान, बोईसर इ. आदिवासीबहुल ग्रामीण भागात एकस्तर वेतनश्रेणी भत्ता (विशेष घटक योजनेच्या गावात) मिळत असल्याने राजकीय पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे काही अधिकारी यांच्याशी साटेलोटे असणाऱ्या अनेक शिक्षकांनी अशा भागातील शाळा बळकाविल्याच्या अनेक तक्रारी आहेत. अशा भागातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शिक्षक असून त्यांची संख्या ६५ च्या दरम्यान असल्याचे कळते. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे यांनी लक्ष घालण्याची पालकांची मागणी आहे.