वसईत वर्षभरात १ हजार १९४ कुटुंब बेपत्ता

By Admin | Updated: January 13, 2016 00:29 IST2016-01-13T00:29:30+5:302016-01-13T00:29:30+5:30

तुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून

1 thousand 1904 families missing in Vasaiat year | वसईत वर्षभरात १ हजार १९४ कुटुंब बेपत्ता

वसईत वर्षभरात १ हजार १९४ कुटुंब बेपत्ता

- शशी करपे,  वसई
तुळींज पोलीस ठाण्यात एका महिन्यात तीन कुटुंबातील १५ जण गायब झाल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. तर वर्षभरात वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात मिळून १ हजार १९४ जण बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत. विशेष म्हणजे तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल ३२२ जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आहे. यातील अनेक बेपत्तांचा ठावठिकाणा शोधण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.
गेल्या महिन्यात मोरेगावातील सात जणांचे इगवे कुुटुंब अचानक गायब झाल्याची तक्रार नोंदवली गेली. धक्कादायक बाब म्हणजे हे कुुटुंब नऊ महिन्यांपासून बेपत्ता असतानाही त्यांच्या नातेवाईकांनी तुळींज पोलिसांकडे डिसेंबर महिन्यात तक्रार दाखल केली. इगवे कुुटुंब ज्योतिष सांगण्याचा व्यवसाय करतात. या कुटुंबात तीन पुरुष, तीन महिला आणि एका दहा महिन्याच्या मुलीचा समावेश आहे. या कुटुंबांचा अद्याप शोध लागलेला नाही.
इगवे कुटुंब गायब झाल्याची तक्रार नोंदवल्यानंतर आठ दिवसांनी गवराई पाड्यातील इद्रशी यांनी आपली पत्नी आणि दोन मुले बेपत्ता असल्याची तक्रार तुळींज पोलीस ठाण्यात नोंदवली. या ही कुुटुंबाचा ठावठिकाणा लागलेला नाही. आता महेश पार्कमधील चौबे कुटुंबीय गूढरीत्या बेपत्ता झाल्याने तुळींज पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. यापूर्वी गायब झालेल्या इद्रशी व इगवे कुटुंबीयांचा अद्याप शोध लागलेला नसताना आता महेश पार्कमधून पती-पत्नी व त्यांची तीन मुले बेपत्ता झाल्याने या सर्व कुटुंबीयांचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हानात्मक बनले आहे.
नालासोपारा पूर्वेतील महेशपार्क मधील अनंता अपार्टमेंटमध्ये अमित अमरनाथ चौबे (३२) व रिता अमित चौबे (३०) हे दाम्पत्य मुलगी खुशी (१०), मुलगा गणेश (७) व लहान मुलगी नैनशी (५) बेपत्ता झाली आहेत. ५ जानेवारी रोजी भार्इंदर येथे राहणारा मनीष चौबे याला उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या त्याच्या लहान काकाच्या मुलाने फोन करुन अमित आजारी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच दिवशी मनीष सायंकाळी ५ वाजता अमित चौबेसह घरातील सर्व मंडळींना भेटून गेला होता. दुसऱ्या दिवशी (ता.६) दुपारी २ वाजताच्या सुमारास अमितची काकी शशिकला चौबे भेटायला गेली होती. परंतु घराला टाळे होेते. नातेवाईकांनी अमित व त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला.पण, ठावठिकाणा न सापडल्याने अखेर मनीष चौबे याने १० जानेवारी रोजी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन पंधरा वर्षांच्या मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्याआधी डिसेंबर महिन्यांत सहा जण बेपत्ता झाल्याची तक्रार वालीव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. दरम्यान, एकट्या तुळींज पोलीस ठाण्यात ३२२ बेपत्ता झाल्याच्या नोंदी आहेत.

बेपत्ता प्रकरणातील अनेक प्रकरणांचा छडा लागलेला आहे. प्रेम प्रकरण किंवा स्वखुशीने घर सोडून गेलेल्यांचाही शोध लागलेला असतो. पण अशा प्रकरणात त्या व्यक्ती पुन्हा घरी येण्यास राजी नसतात. त्यामुळे बेपत्ता आणि आढळून आलेल्या आकड्यांमध्ये तफावत दिसून येते. मानवी तस्करीची प्रकरणे आपल्यात नाहीत तरी सुद्धा आपण बेपत्ता प्रकरणाची माहिती अँटी हयुमन ट्रॅफीकींग युनिटकडे देत असतो. जी कुटूंबे गायब आहेत त्यांचे मोबाइल फोन बंद असल्याने तपासात अडथळा येत आहे. खबरदारी म्हणून अशा प्रकरणांची वेगवेगळ्या दृष्टीकोनातून तपासणी करीत आहोत.
- श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक

Web Title: 1 thousand 1904 families missing in Vasaiat year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.