राष्ट्रविकासात युवकांनी सक्रिय सहभाग दर्शवावा
By Admin | Updated: March 3, 2016 02:12 IST2016-03-03T02:12:49+5:302016-03-03T02:12:49+5:30
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून युवक-युवतींनी आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रविकासात युवकांनी आपला सहभाग दर्शवावा.

राष्ट्रविकासात युवकांनी सक्रिय सहभाग दर्शवावा
आशुतोष सलील : युवा संसद कार्यक्रमात साधला संवाद
वर्धा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून युवक-युवतींनी आपल्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावा. राष्ट्रविकासात युवकांनी आपला सहभाग दर्शवावा. देशाने माझ्यासाठी काय केले यापेक्षा मी देशाला काय दिले हा विचार युवकांनी केला पाहिजे, असे मत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी व्यक्त केले. नेहरू युवा केंद्र, वर्धा द्वारा आयोजित ‘युवा संसद’ कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते युवकांसोबत संवाद करताना बोलत होते.
युवा कार्यक्रम तथा खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्यावतीने स्थानिक विकास भवन येथे सोमवारी ‘युवा संसद’ कार्यक्रम पार पडला. युवा संसदेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सलील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक मेहरे होते. जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, तुषार तडस, युवराज राऊत, पंकज वंजारी, संजय अवचट, सतीश इंगोले मंचावर उपस्थित होते.
तुषार तडस यांनी राज्य शासनाच्या विविध सेवांबद्दल युवकांना मार्गदर्शन करुन लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी मान्यवरांनी युवकांसोबत संवाद साधला. रसेच विविध क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला.
डॉ. मेहरे म्हणाले, युवकांनी आपला आत्मविश्वास वृध्दिगंत करून आपल्या उद्यमशितलतेत वाढ करावी. आपला विकास साधावा. युवापिढीने किमान एका क्षेत्रातील कौशल्य हस्तगत केले पाहिजे तरच स्वत:च्या पायावर उभे राहता येईल.
यानंतर संजय माटे यांनी २०१४-१५ वर्षाकरिता असलेला उत्कृष्ट जिल्हा युवा मंडळ पुरस्कार जाहीर केला. आष्टी (शहीद) येथील आदर्श युवा बहुउद्देशीय मंडळ यांना हा पुरस्कार प्रदान केला. रोख व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सलील यांचे हस्ते प्रदान केले.
कार्यक्रमाचे संचालन सतीश इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन धरमलाल धुवारे यांनी केले. कार्यक्रमाला मंगेश दुबे, राहुल लाखे यांनी सहकार्य केले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे सर्व तालुक्यातील राष्ट्रीय युथ कोअर स्वयंसेवकांची उपस्थिती होती.(स्थानिक प्रतिनिधी)