‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव
By Admin | Updated: February 5, 2016 01:43 IST2016-02-05T01:43:08+5:302016-02-05T01:43:08+5:30
शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे,

‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’ने घेतला ठाव
इंद्रजित भालेराव यांचे काव्यगायन रंगले : दाते स्मृती व्याख्यानमालेतील उपक्रम
वर्धा : शेतकऱ्यांची वेतना ही देशव्यापी असून शेतीत राबणाऱ्या हातांनी आता शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात दोन हात करायला शिकले पाहिजे, अशी भूमिका मांडत ‘शिक बाबा शिक लढायला शिक, कुणब्याच्या पोरा आता लढायाला शिक’, असे आवाहन शेतकऱ्यांचा कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित असणाऱ्या परभणीचे इंद्रजित भालेराव यांनी केले. यशवंतराव दाते स्मृती संस्था आयोजित व्याख्यानमालेच्या द्वितीय सत्रात त्यांच्या काव्यगायनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात तब्बल दोन तास रंगलेल्या या काव्यगायन कार्यक्रमात आपला जीवनपट उलगडून दाखवितानाच दर्जेदार व लयबद्ध कवितांनी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी रसिकांना भुरळ घातली. आजच्या कवींनी शेतकरी आणि गाव, हे विषय विनोदाचे केले आहेत. महात्मा फुल्यांचा शेतकरी अजूनही कवितेतून व्यक्त होत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी, मंचावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, प्रा. शेख हाशम, संजय इंगळे तिगावकर, डॉ. स्मीता वानखेडे आदी उपस्थित होते.
‘पाखरं असली तरी ती ओळखायच्या बापाच्या मनातील भाव, सुगी संपली तरी चिमण्या सोडत नसायच्या गाव’ ही परिस्थिती आता बदलत चालली आहे. गांधींनी दिलेला ‘गावाकडे चला’ हा संदेश गावे स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हावीत या उद्देशाने होता, असे सांगून भालेराव यांनी, ‘काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता’, ‘शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची छाप, तिथे राबतो कष्टतो, माझा शेतकरी बाप’ आदी कविता सादर केल्या. ‘पंतप्राधन म्हणाले की, शेतकऱ्याला आपल्या देशाचे नियोजन करता येत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी म्हणाले, आतापर्यंत या देशाचे नियोजन जमले नाही, म्हणून किती पंतप्रधानांनी आत्महत्या केल्या? असा प्रश्न उपस्थित करीत ‘मरायला नाही आता मारायला शिक, शिक बाबा शिक जगायला शिक’ हा आपल्या कवितेचा धागा पुढे नेला. त्यांनी ‘एकुलती एक लाडाची लेक, जिजाऊ शिकते भालाफेक’ हे गीत सादर केले आणि उपस्थितांनीही गाण्यासोबत ठेका धरला.
संचालन डॉ. स्मीता वानखेडे यांनी केले. प्रास्ताविक संजय इंगळे तिगावकर यांनी केले तर आभार प्रदीप दाते यांनी मानले. यावेळी डॉ. किशोर सानप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मडावी, सुनील राऊत, डॉ. शिरीष गोडे, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, प्राचार्य रोंघे, प्रा. कोंगरे, डॉ. कोटेवार, अभ्युदय मेघे, मधुकर इंगळे, जयंत साळवे, अशोक चौधरी, प्रा. राजेंद्र गावंडे, प्रा. डी.के. देशमुख, शेषराव बिजवार, पंडित देशमुख, लक्ष्मीनारायण सोनवणे, माहिती सहायक श्याम टरके, डॉ. खंडारे, प्रा. किशोर वानखडे, मीना कारंजेकर, मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, भाऊ थोटे, प्रकाश येंडे, डॉ. दीपक पुनसे, रंजना दाते, प्रा. राजेंद्र मुंढे, डॉ. विजय बोबडे, डॉ. ना.ह. खोडे, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रमोद नारायणे, गौरीशंकर टिबडेवाल, दिलीप कठाणे, वसंत जळीत, प्रा. काळे, गुणवंत डकरे, नंदकुमार वानखेडे आदी साहित्यप्रेमी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)