यंदा कपाशीचा पेरा वाढणार
By Admin | Updated: June 16, 2014 23:39 IST2014-06-16T23:39:15+5:302014-06-16T23:39:15+5:30
गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून

यंदा कपाशीचा पेरा वाढणार
अरुण फाळके - कारंजा(घा)
गत चार ते पाच दिवसांपूर्वी तालुक्यात पावसाच्या सरी आल्या. त्यामुळे कारंजा(घा.) तालुक्यातील बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला जोमाने सुरूवात केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून यावर्षी सोयाबीन पेक्षा, कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तसेच सोयाबीनचे घरगुती बियाणे वापरण्यावर शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.
सोयाबीन बियाण्यांची उगवणशक्ती तपासूनच ती वापरा, असा कृषी विभागाचा सल्ला आहे. कारंजा तालुक्यातील ३५ कृषी सेवा केंद्र बियाणे व खतांचा साठा करून विक्रीसाठी सज्ज झालेली आहेत. यावर्षी तालुक्यातील ४२ हजार ५०० हेक्टर जमीन खरीप हंगामासाठी लागवडीखाली येणार आहे. यात २५००० हेक्टरमध्ये सोयाबीन, ९५०० हेक्टरमध्ये कापूस, १ हजार हेक्टरमध्ये ज्वारी, ६५०० हेक्टरमध्ये तूर, ३०० हेक्टरमध्ये भूईमुंग, तर २०० हेक्टरमध्ये इतर पिके घेतली जाणार असल्याचा अंदाज व नियोजन आहे.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे उत्पादन अत्यल्प झाले. सुरवातीला भाव मिळाला नाही. परिणामी यावर्षी सोयाबीन पेक्षा कपाशीचा पेरा जास्त करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मागील वर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे निकोप बियाणे सुद्धा तयार होवू शकले नाही. काही व्यापाऱ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून, राज्यातून बियाणे आणून, शेतकऱ्यांसाठी विकण्यास उपलब्ध केले आहे. पण या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबद्दल कोणीही खात्री द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून घेतलेले असो वा घरचे बियाणे असो पुढील धोका व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी उगवण क्षमता आपल्या घरी तपासूनच पेरणी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने जाहिररित्या करण्यात आले आहे.
मागील वर्षी नापिकीमुळे त्रस्त झालेला शेतकरी हे महागडे बियाणे घेवू शकत नसल्यामुळे खासगीतून कमी दराचे सुटे बियाणे तो विकत घेत आहे. ६० ते ७० रूपये किलो असा खासगी बियाण्यांचा दर आहे.
बँकांनी अद्याप क्रॉप लोन प्रकरणे मंजूर केलेली नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने क्रॉप लोन उपलब्ध करून द्यावे तसेच गारपीट व अतिवृष्टीने त्रस्त झालेल्या किमान अल्पभूधारकांना तरी शासनाने विनामूल्य बियाणे उपलब्ध करून द्यावे, तसेच पीककर्ज त्वरीत देण्यासाठी बँकांवर दडपण आणावे. असा आग्रह तालुक्यातील आर्थिक कोंडीत सापडलेला शेतकऱ्यांनी धरलेला आहे. तालुक्यातील कृषी केंद्रात २५०० मेट्रीक टन रासायनिक खत, कपाशीच्या बियाण्याचे १५ हजार पॅकेट, व सोयाबीनचे पहिल्या टप्प्यात पुरेल येवढे बियाणे उपलब्ध असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल आदेवार यांनी दिली. पण बियाण्यांची उगवणशक्ती शेतकरी वर्गाने आधी तपासूनच नंतर पेरा करून दुबार पेरणीचा धोका टाळावा असे आवाहनही जिल्ह्यातील कास्तकारांना करण्यात आले आहे.