जखमा झालेल्या पायांनी त्यांनी धरली गावाची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 05:00 IST2020-05-06T05:00:00+5:302020-05-06T05:00:07+5:30
लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले.

जखमा झालेल्या पायांनी त्यांनी धरली गावाची वाट
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाने गावांच्या वाटा थांबविल्या. हजारो कामगार, विद्यार्थी आदी जागच्या जागेवरच थांबले. परतीचा प्रवास कधी करायला मिळणार, याची कुणालाही खात्री नव्हती. शासनाने परतीचे मार्ग सुरू केले. पण, त्यातही अडथळ्यांची शर्यत. यात मजुरांची परवड होत आहे. प्रखर उष्णतामान, चालताना रस्त्यांचे असह्य चटके सहन करीत मजुरांनी सुरू असलेली मजल-दरमजल शासन, प्रशासनाच्या उपाययोजनांकडे आशेने पाहत आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक जण आहे त्याच ठिकाणी अडकून आहेत. अनेकांनी लॉकडाउनच्या काळात घरचा रस्ता धरला. या राज्यातून त्या राज्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू झाली. परवानगी मिळवून तर कधी परवानगीची प्रतीक्षा न करता घरच्या वाटा जवळ करणे सुरू झाले. अनेक जण गावी पोहोचले. अनेक जण आहे त्याच ठिकाणी थांबले. लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला आणि सर्वांच्याच जिवाची घालमेल सुरू झाली. शासनाकडून परराज्यात, परजिल्ह्यात जाणाऱ्यांची व्यवस्था करण्यास सुरूवात झाली. त्याकरीता काही निमयावली लागू करण्यात आली. शासन उपाययोजना करीत असले तरीही मजुरांचे गावाकडे मार्गक्रमण सुरू आहे. अनेक जण मिळेल त्या वाटेने गावी जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. वर्ध्यातही मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे यवतमाळ जिल्ह्यातून २४ कामगार आले. यवतमाळ जिल्ह्याच्या आणि तालुक्यातील एका भागात रस्त्याचे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
लॉकडाउनच्या सुरुवातीपासून आतापर्यंतचा काळ काढला. पण, आता खाण्यापिण्याचे वांधे होऊ लागल्याने परतीचा मार्ग धरल्याचे कामगारांनी सांगितले. ज्या कंत्राटदाराने कामावर आणले, तोही परराज्यातील आहे. एकमेकांच्या ओळखीने त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. मागील चार दिवसांपासून सातत्याने ते चालत आहेत. आज ते जिल्हाधिकारी कार्यालयापुढे रस्त्याच्या कडेला झाडाच्या सावलीत विसावलेत. यातील बहुतांश मजुरांचे पाय चालल्याने सुजले आहेत काहींनी पायाला झालेल्या जखमा चिंध्या गुंडाळून झाकल्या आहेत. या कामगारांना गावी जाण्यासाठी येथून वाहनाची सुविधा करून मिळेल, अशी अपेक्षा आहे.
मदत मिळाली, गावी जाण्याची व्यवस्था हवी
चालताना वाटेमध्ये मदत मिळाली. कुणी जेवण दिले तर कुणी पाणी दिले. पण, वाहन नसल्याने ही पायपीट असह्य होत आहे. अजूनही या कामगारांची गावे हजारो किलोमीटर दूर अंतरावर आहे. आताच पायाला दुखापत झाली आहे. पुढचा प्रवास तर असह्य वेदना करणारा ठरू शकतो. प्रशासनाने गावी जाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त होत आहे.