वीज कर्मचारी घेताहेत ‘डबडब-टनटन’चा कानोसा
By Admin | Updated: June 20, 2014 00:00 IST2014-06-20T00:00:05+5:302014-06-20T00:00:05+5:30
पावसाळ्याच्या दिवसात वेळी अवेळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होतो. तो सुरळीत करण्याकरिता कर्मचारी विद्युत खांबावरील इन्सुलेटर्सवर पाना-पेनचिस मारत ‘डबडब-टनटन’चा कानोसा घेत असल्याचे चित्र आहे.

वीज कर्मचारी घेताहेत ‘डबडब-टनटन’चा कानोसा
रूपेश खैरी - वर्धा
पावसाळ्याच्या दिवसात वेळी अवेळी केव्हाही वीजपुरवठा खंडित होतो. तो सुरळीत करण्याकरिता कर्मचारी विद्युत खांबावरील इन्सुलेटर्सवर पाना-पेनचिस मारत ‘डबडब-टनटन’चा कानोसा घेत असल्याचे चित्र आहे.
सतत खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्याच्या कारणाचा शोध घेतला असता विजेचे वहन करणाऱ्या पीन इन्सुलेटर व डिस्क इन्सुलेटर्समध्ये शिरणारे पाणी असल्याचे समोर आले. यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यावर अशा इन्सुलेटर्सचा शोध घेण्याकरिता भर पावसात कर्मचारी फिरत आहेत.
संतश्रेष्ठ गोरोबा कुभारांनी मातीच्या मटक्यांना आकार देत संतवाणीच्या ओव्या लिहिल्या. मटके तयार झाल्यावर पाणी भरून ठेवण्याच्या स्थितीचे झाले किंवा नाही हे तपासण्यासाठी त्यांना साहजीकच मटक्यांना ठोकून ठोकून वाजवून पाहावे लागले नसेल तर नवलच. तसाच काहीसा प्रकार महाविरणच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत घडतोय. महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वीजयंत्रणेत लावलेल्या पीन इन्सुलेटर, डिस्क इन्सुलेटरर्सना तपासण्यासाठीही हाच ठोकताळा वापरावा लागत आहे. ही पद्धत वर्षानुवर्षे स्टेथेस्कोपप्रमाणे तपासून वीजपुरवठा पुर्ववत करण्यात मदतगार साबीत होत आहे.
विजेचे वहन करताना विजेची गळती होवून आसपाच्या लोखंडी वस्तुंशी स्पर्श होवून होवू नये व विजेचे समान वहन होणे हे इन्सुलेटर्स व डिस्क इन्सुलेटर्सचे महत्त्वाचे कार्य आहे; परंतु विजेचे वहन करताना हेच जास्त गरम होत असतात. मग पावसाळ्यांच्या दिवसात थोडेही पाणी पडले की, त्यांना तडा जावून, त्यात पाणी शिरले की वीजपुरवठा ठप्प.. लोकांची बोंबाबोंब... वीज कर्मचारी किंवा जनमित्रांना मग वीजखंबावर चढून आपले कान या अशा अनेक इन्सुलेटर्स किंवा डिस्क इन्सुलेटर्सना अक्षरश: पाना, पेचकचने ठोकून डबडब आवाज तर येत नाही ना, याची शहानिशा करावी लागते. वरवर सोपी वाटणाऱ्या या कामात प्रदूषणाचा व्यत्यय येत असतोच; परंतु महावितरणच्या जनमित्रांची ही कसरत सुरूच असते.
इन्सुलेटर्स व डिस्क इन्सुलेटर्सच्या तपासणीअंती मग जेव्हा डबडब आवाज करणारा पंक्चर झालेला इन्सुलेटर सापडतो तेव्हा तो बदलून वीजपुरवठा पुर्ववत होतो. हे कार्य करताना मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.